आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. देशात भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. विरोधी पक्ष देखील एकवटले आहेत. परंतु असे असताना आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला ३०० जागाही मिळणार नाहीत असे मोठं विधान काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केलं आहे. काँग्रेसकडून जय्यत तयारी सुरु असताना पक्षातील नेत्यानेच असं विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. जर ३७० कलम हटवण्यासाठी ३०० खासदार हवे आहेत त्यामुळे खोटं आश्वासन देणार नाही असेही गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद जम्मू-काश्मीरच्या पुंछ येथील एका कार्यक्रमादरम्यान जनतेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीत ३०० जागा मिळणार नाहीत असे वक्तव्य केलं आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधील ३७० च्या कलमावर मौन पाळण्यामागील कारणही स्पष्ट केलं आहे. ३७०च्या कलमाबाबतचे प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयात आहे. संसदेतही आहे त्यामुळे जर ३७० कलम हटवायचे असल्यास काँग्रेसकडे बहुमत लागेल. हा कायदा लागू करण्याबाबतचे खोटं आश्वासन मी देऊ शकत नाही असे गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री होणं माझ्यासाठी महत्त्वाचे नाही
जम्मू कश्मीरमध्ये सध्याची परिस्थिती वाईट झाली आहे. आपल्याकडून आपल्या राज्याचा दर्जा हिसकावून घेतला गेला आहे. जमीन आणि नोकऱ्यांमधील आपले अधिकार हिरावून घेतले गेलेत अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री होणं माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. परंतु राज्याची ओळख आणि नोकरी व जमिनींवरील अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काम करायचे आहे. तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी फक्त आलो असल्याचे गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीत ३०० जागा मिळणं कठीण
काँग्रेस नेते आझाद यांनी म्हटलं आहे की, आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ३०० खासदार असतील असे मला वाटत नाही आहे. जेव्हा निवडणुका येतील तेव्हासाठी माझी विनंती राहील की जात, धर्म या आधारावर मतदान करु नका करत केवळ विकासाच्या मुद्द्यावर मतदान करा, अशा लोकांना निवडून द्या जे तुमचा विकास करतील.
हेही वाचा : CM Uddhav Thackeray Discharge: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना २२ दिवसानंतर डिस्चार्ज