१ मे महाराष्ट्र आणि कामगार दिनानिमित्त आज सर्व स्तरावरून हुतात्म्यांना अभिवादन केलं जात आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन केलं आहे. अशातच भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यानेही महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. १ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या गुजरात दिनाचं औचित्य साधून कर्णधार हार्दिकने हा विजय गुजरातमधील प्रत्येक व्यक्तिला समर्पित केला.
“गुजरात दिनाला उद्या ६२ वर्ष पूर्ण होत असल्याने गुजरात टायटन्स मुंबईत त्याचं जंगी सेलिब्रेशन करणार आहे. संघाचे सर्व खेळाडू गुजरातच्या पारंपरिक वेशात दिसतील. हार्दिक पांड्यानेही गुजरातच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, रविवारी गुजरात दिन आहे आणि त्यानिमित्ताने आजचा हा विजय गुजरातच्या जनतेला समर्पित. तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल आभार. मी महाराष्ट्रात भरपूर क्रिकेट खेळलो आहे आणि मी महाराष्ट्र दिनाच्याही शुभेच्छा देतो.”, असं हार्दिक पंड्या म्हणाला.
गुजरात टायटन्सने शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा गडी राखून पराभव केला. विराट कोहली फॉर्मात परतला असतानाही, त्याने अर्धशतक झळकावले असतानाही गुजरात टायटन्सने बाजी मारली. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली फॉर्ममध्ये परतल्याने आरसीबीने २० षटकांत ६ बाद १७० धावा केल्या. आरसीबीसाठी डावाची सुरुवात करणाऱ्या भारताच्या माजी कर्णधाराने ५३ चेंडूत ५८ धावा केल्या. रजत पाटीदारने ३२ चेंडूत ५२ धावा केल्या. गुजरात टायटन्सने तीन चेंडू राखून लक्ष्य गाठले.