देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरुच आहे. यादरम्यान आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील २४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात १५ टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हीटी रेट आहे. तर ८ राज्यांमध्ये ५ ते १५ टक्के पॉझिटिव्हीटी रेट असून ५ टक्क्यांहून कमी पॉझिटिव्हीटी रेट ४ राज्यांमध्ये आहे.
देशात आतापर्यंत ८३.२६ टक्के प्रकरणे बरे झाले असून सुमारे ३७.१ लाख सक्रिय रुग्णांची संख्या आहे. ३ मेला रिकव्हरी रेट ८१.३ टक्के होता ज्यानंतर रिकव्हरी रेटमध्ये सुधारणा झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३ लाख ६२ हजार ७२७ रुग्णांची नोंद झाली आहे. देशात लसीकरण मोहिम वेगाने सुरू आहे आणि आतापर्यंत १७ कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे.
तसेच लव अग्रवाल यांनी सांगितले की, १० राज्यांमध्ये संक्रमण दर २५ टक्क्यांहून जास्त आहे आणि १८ राज्यांमध्ये २० टक्क्यांहून अधिक आहे. ही बाब चिंताजनक असून यावर लक्ष देणे आवश्यक आहे. देशातील १२ राज्यांमध्ये १ लाखांहून अधिक सक्रिय आहेत. तर ८ राज्यांमध्ये ५० हजार ते १ लाख दरम्यान सक्रिय रुग्ण असून १५ राज्यात ५० हजारांपेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत.
हेही वाचा – Maharashtra Corona Update: राज्यातील रुग्णसंख्येचा आलेख होतोय कमी पण…- राजेश टोपे