भारतात यावर्षी उष्णतेचे नवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. उत्तरेकडील राज्यात तापमानात कमालीची वाढ झालेली आहे. राजस्थानच्या चुरु येथे काल ५० डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. तर दिल्लीत ४७.६ डिग्री आणि हरियाणाच्या हिस्सार येथे ४८ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्याने आणखी काही दिवस ही उष्णतेची लाट कायम असणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान नासाने देखील सॅटेलाईट इमेजेसद्वारे गेल्या काही दिवसांपासून भारतात उष्णतेने काय कहर केला आहे, याची झलक दाखवली.
स्काइमेट वेदरचे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ महेश पलावत यांनी मंगळवारी दिवसभरात वातावरणात उष्णता जाणवेल असे सांगितले होते. दिवस जसजसा पुढे जात होता, तशी उष्णतेची लहर वाढत होती. पुढचे दोन दिवस उत्तरेतील तापमान ४६ ते ४७ डिग्रीपर्यंत राहू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नासाचे उपग्रह हे जमिनीवरील तापमान दर्शविणारे फोटो घेत असतात त्यातून हे फोटो घेतले असून त्यामध्ये तापमान कशा पद्धतीने वाढत गेले याचे चित्र दिसत आहे.
हा १९ मे रोजीचा फोटो असून त्यात अम्फन वादळाची व्याप्ती दिसून येते. अम्फनने पश्चिम बंगा आणि बंग उपसागरात थैमान घातले होते.
हा २१ जानेवारी रोजीचा फोटो आहे. यात आपल्याला स्पष्टपणे मे आणि जानेवारीमधील तफावत दिसून येते. थंडीच्या दिवसांचा शेवट जानेवारीमध्ये होत असतो आणि उष्णतेची चाहूल लागत असते.
वरील सर्व फोटो हे नासाच्या Woldview या ओपन सोर्स प्रोजेक्टमधून घेण्यात आलेले आहेत. तापमान, हवेचे प्रदूषण, आग, पूर आणि वादळाचा अभ्यास करण्यासाठी नासातर्फे जे उपग्रह सोडण्यात आले आहेत. त्याद्वारे हे फोटो घेण्यात येतात. वरील फोटो हे जमिनीवर असलेले तापमान दर्शवत आहे.
आयएमडीचे के.एस. होसलिकर यांनी लोकांना सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान घराबाहेर पडू नका, असा इशारा दिला आहे. हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, पुर्व मध्य प्रदेश आणि विदर्भात २८ मे पर्यंत कडक उन्हाळ्याची स्थिती असेल. तर पुढच्या दोन दिवसांत पंजाब, छत्तीसड, ओडिशा, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार आणि झारखंडमध्ये देखील उष्णता वाढेल, असे आयएमडीतर्फे सांगण्यात आले आहे.