हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशसह उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी रस्त्यांनी नदीचे रुप धारण केले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात भूस्खलनाच्या घटना सातत्याने घडत आहेत. या पुरस्थितीत आत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 अधिक नागरिक बेपत्ता आहेत. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. गेल्या 24 तासांपासून या ठिकाणी मुसळधार पावासाने थैमान घातले आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला, कांगडा, चंबा, मंडी या भागात पावसाचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. एकट्या मंडीमध्ये अतिवृष्टीमुळे आलेला पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण बेपत्ता आहेत. या बेपत्ता नागरिकांचा बचाव पथकाकडून शोध सुरु आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राज्यात 30 हून अधिक ठिकाणी मुसळधाक पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर 34 हून अधिक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना समोर आल्या आहेत.
दरम्यान पंजाब-हिमाचाल प्रदेश सीमेजवळ कांग्रा जिल्ह्यात असलेला इंग्रजांच्या काळातील एक रेल्वे पूलही कोसळला आहे. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्याने हा पूल कोसळल्याची माहिती आहे. तर चंबा येथील बनेट गावातही भूस्खलनामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तीन जणांचा मृत्यू झाला. यातील दोन मृतदेह सापडले असून तिसऱ्यादा शोध सुरु आहे. हिमाचलमध्ये येणाऱ्या पर्यटन आणि भाविकांना राज्य सरकारने अशा परिस्थितीत न येण्याचे आवाहन केले आहे. मात्र तरी देखील नागरिक स्वत:चा जीव धोक्यात घालून याठिकाणी येत आहेत.
#WATCH | Himachal Pradesh: The railway bridge on Chakki river in Himachal Pradesh’s Kangra district damaged due to flash flood, and collapsed today morning. The water in the river is yet to recede: Northern Railways pic.twitter.com/ApmVkwAkB8
— ANI (@ANI) August 20, 2022
742 रस्ते बंद, 232 कोटी रुपयांची मदत जाहीर
हिमाचल प्रदेशातील पुरस्थिती लक्षात घेता येथील राज्य सरकारने शनिवारी तात्काळ बैठक घेत 232 कोटींचा आपत्कालीन निधी मंजूर केला. तर अशापरिस्थिती हिमाचल प्रदेशातील एकूण 742 रस्ते बंद करण्यात आले आहेत.
पुढील 4 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट
दरम्यान हवामान विभागाकडून पुढील 3 ते 4 दिवस राज्यात मुसळधार पावसासाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अद्यापही हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस सुरु आहे. तर पुढील 4 दिवस अजून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांप्रती मुख्यमंत्री जयमराम ठाकूर यांनी शोक व्यक्त केला असून जिल्हा प्रशासन, बचाव व पुनर्वसन विभागाला जलद गतीने मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत.
उत्तराखंडलाही पावसाचा तडाखा
हिमाचल प्रदेशातील कांगडा, चंबा, बिलासपूर, सिरमौर आणि मंडी या पाच जिल्ह्यांत मुसळधार पावसाने कहर केला असातना आता कुल्लूमध्येही मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जारी केला आहे. याशिवाय उत्तराखंडमध्ये सकाळी झालेल्या ढगफुटीमुळे पुराचा धोका वाढला आहे.