केरळमधील अनेक भागांत बुधवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने केरळमधील सात जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड या सात जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील काही भागात जनजीवन ठप्प झाले आहे. पुढील चार दिवस राज्यात मुसळधार आणि अतिवृष्टीचा अंदाज केंद्रीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तसंच, केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केरळ आणि आसपासच्या चक्रीवादळामुळे व उत्तर केरळपासून विदर्भापर्यंत कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात येत्या पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, देशातील विविध हवामान अंदाज केंद्रांनी बुधवारी राज्यभरात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या महिन्याच्या अखेरीस नैऋत्य मोसमी पाऊस सुरू होण्याची शक्यता असतानाही अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हा अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.
नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सने केरळमध्ये आधीच पाच टीम तैनात केल्या आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लोकांना पाऊस कमी होईपर्यंत नद्या आणि इतर जलकुंभांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. SDMA ने लोकांना आपत्कालीन परिस्थिती असल्याशिवाय डोंगराळ भागात न जाण्यास सांगितले आहे. यासोबतच पाऊस कमी होईपर्यंत रात्रीचा प्रवास टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनानेही नागरिकांना समुद्रकिनाऱ्या न जाण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, किनारी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याशिवाय, वादळ आणि पुराच्या धोका लक्षात घेता मदत आणि बचावासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.
हेही वाचा – राज ठाकरेंची पुढच्या आठवड्यात पुण्यात सभा, उद्या 12 वाजता करणार घोषणा