(Hindi vs Tamil) चेन्नई : तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदी भाषाविरोधी भूमिका कायम ठेवली आहे. विविध राज्ये आपापल्या भाषांचे संरक्षण करू शकली नाहीत, तर हिंदीचे वर्चस्व प्रस्थापित होईल, अशी भीती व्यक्त करतानाच मुलाचे नाव तामिळमध्येच ठेवण्याचा आग्रह त्यांनी नवदाम्पत्यांना यापूर्वीच केला आहे. आता पुन्हा एकदा हिंदी भाषेविरुद्ध एल्गार पुकारताना हिंदीमुळे तामिळ भाषा संपुष्टात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. (Dayanidhi Stalin’s stand against Hindi language)
तामिळनाडूमध्ये गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात तमिळ थाई वाझथू गायले जात होते. त्या गाण्यातून द्रविड हा शब्द चुकून वगळला गेला, त्यानंतर मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हा तामिळ भाषेचा अपमान असल्याचे म्हटले होते. तर, उदयनिधी स्टॅलिन यांनी, तामिळवर हिंदी भाषा थेट लादता येत नाही म्हणून थाय वाझथू या गीतातील काही शब्द वगळले जात असल्याचा आरोप केला होता. राज्यात अनेक लोक हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या मुलाचे नाव तामिळमध्ये ठेवावे, असे आवाहन त्यांनी राज्यातील नवदाम्पत्यांना केले होते.
हेही वाचा – ECI Commissioner : राजीव कुमार यांच्या काळात वाघाचे पाळीव मांजर झाले, ठाकरेंचा हल्लाबोल
त्यापाठोपाठ, नोव्हेंबर महिन्यात कोझिकोड येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी स्थानिक भाषांबद्दल चिता व्यक्त केली. उत्तर भारतातील सर्व भाषांनी हिंदीला पुढे येण्याचा मार्ग विस्तृत केला आहे. आपण आपल्या भाषेचे संरक्षण करण्यात अयशस्वी ठरलो तर, आपल्या संस्कृतीवर हिंदी भाषेचा वरचष्मा राहील आणि आपली ओळख नष्ट होईल. त्यामुळे हिंदी लादण्याच्या विरोधात द्रविड चळवळ आहे. तथाकथित राष्ट्रवाद्यांना आजही सर्व बिगरहिंदी भाषिक राज्यांवर हिंदी लादायची आहे. तेच प्रत्यक्षात फूट पाडणारे असल्याचा आरोप उदयनिधी स्टॅलिन यांनी केला होता.
आता त्यांनी पुन्हा एकदा याचा पुनरुच्चार केला. मंगळवारी चेन्नईमध्ये विरोधकांच्या इंडि आघाडीने केंद्र सरकारविरुद्ध निदर्शने केली. त्यावेळी स्टॅलिन यांनी हिंदी भाषेबद्दल टिप्पणी केली. हिंदीने उत्तरेकडील राज्यांच्या स्थानिक भाषा जसे की राजस्थानी, हरियाणवी, भोजपुरी आणि इतर बिहारी भाषा संपुष्टात आणल्या आणि तीच प्रमुख स्थानिक भाषा बनली आहे. तामिळनाडूमध्येही ही भाषा लागू केल्यास येथेही तेच होईल, असे ते म्हणाले.
परदेशात आणि इस्रोसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये काम करणारे जवळजवळ 90 टक्के तामिळ लोक ज्या शाळांमध्ये शिकले, त्या शाळांमध्ये हिंदी शिकवली जात नाही, याकडे लक्ष वेधून ते म्हणाले की, गेल्या 100 वर्षांत तामिळनाडूमध्ये शिक्षण आणि हिंदी भाषा येथे लागू करण्याच्या मुद्द्यावर मोठी निदर्शने झाली आहेत. ‘थलमुथु, नटराजन आणि कीझपालूर चिन्नास्वामी यासारख्या शहिदांनी राजकारण म्हणून नव्हे तर, तामिळ भाषेसाठी आपले प्राण दिले. आपल्या भाषेसाठी प्राण देण्यास हजारो लोक तयार आहेत, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – New ECI Commissioner : गुप्त कारवाया का कराव्या लागतात? ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल