नवी दिल्ली : आपल्याकडे (2024च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत) 400 दिवस आहेत आणि आम्हाला लोकांच्या सेवेसाठी सर्व काही करायचे आहे. आपल्याला इतिहास घडवायचा आहे. जो संकल्प करतो तोच इतिहास घडवतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या शेवटच्या दिवशी पक्षाच्या नेत्यांना संबोधित करताना सांगितले.
पंतप्रधानांच्या आजच्या भाषणाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात भारताचा सुवर्णकाळ येणार असल्याचे सांगितले. समाजाच्या सर्व घटकांशी जवळीक निर्माण करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना केले. विकासकामांमध्ये आपली सर्व शक्ती खर्च करावी लागेल. पृथ्वी मातेची हाक ऐकायची आहे. पृथ्वी मातेला वाचवायचे आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
PM said that youths aged b/w 18-25 haven’t witnessed misgovernance of previous govt & how India has now moved from misgovernance to good governance under present govt. So awareness about it must be created among youths, BJP will do it in coming days: BJP leader Devendra Fadnavis pic.twitter.com/ifNP8MhpqU
— ANI (@ANI) January 17, 2023
आपण कुशासनाकडून सुशासनाकडे कसे आलो आहोत, हा संदेश आपल्याला तरुणांपर्यंत पोहोचवायचा आहे. समाजातील सर्व घटकांशी संवेदनशीलतेने जोडले गेले पाहिजे. भाजपाला मतांची चिंता न करता देश आणि समाज बदलण्याचे काम करावे लागेल, असे पंतप्रधानांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आजचे पंतप्रधान मोदींचे भाषण प्रेरणादायी तसेच एक नवा मार्ग दाखविणारे असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ज्या प्रकारे आम्ही बेटी वाचवा मोहीम यशस्वी केली, त्याच प्रकारे आपल्याला पृथ्वी वाचवा मोहीम राबवावी लागेल. खतांच्या अतिवापरामुळे हवामानातील बदल आणि पृथ्वीमातेवर होणारे परिणाम कमी करण्याची गरज आहे, असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
जिल्ह्यांच्या विकासातही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भूमिका बजावली पाहिजे. याशिवाय, सर्व राज्यांनी एकमेकांशी समन्वय वाढवून भावनिकदृष्ट्या एकमेकांशी जोडले गेले पाहिजेत, असे सांगून नरेंद्र मोदी म्हणाले, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण भारताच्या विकासासाठी व्यतित केला पाहिजे. या ‘अमृत काल’चे ‘कर्तव्य काल’मध्ये रूपांतर करूनच देशाला पुढे नेले जाऊ शकते.
विशेष म्हणजे, आज भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. नड्डा यांना जून 2024पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.