कोरोना महामारीच्या सुरूवातीच्या काळात, सरकारने आयुष्मान भारत योजनेमध्ये कोरोनाच्या तपासणीसह उपचारांचा देखील समावेश केला. ‘आयुष्मान भारत’ या योजनेला ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ म्हणूनही ओळखले जाते. काही राज्य सरकारांनी या योजनेची व्याप्ती ऑक्सिजन पुरवठ्यापासून कोरोनावरील उपचारांसाठी आवश्यक असणाऱ्या औषधांची किंमत पूर्ण करण्यापर्यंत वाढविली आहे. जाणून घ्या या संपूर्ण योजनेविषयी…
आयुष्मान भारत योजनेंतर्गत देशातील गरीब, वंचित आणि दुर्बल घटकातील १० कोटी कुटुंबांना म्हणजेच ५० कोटी लोकांना आरोग्य विम्याची सुविधा देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत या कुटुंबांना दर वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा मिळतो. परंतु, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. ग्रामीण भागात या योजनेचा लाभ फक्त अशाच लोकांना मिळू शकतो, ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, कुटुंबातील प्रमुख एक स्त्री आहे, कुटुंबातील कोणी अपंग आहे, दैनंदिन मजुरी करणारे, बेघर, निराधार, भीक मागून आपले पोट भरणारे, आदिवासी किंवा मजूर असणाऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येतो.
या योजनेंतर्गत शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयेही जोडली गेली आहेत. या योजनेत जवळपास सर्व प्रकारच्या रोगांवर उपचार केले जातात. तसेच यात कर्करोग शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी, केमोथेरपी, ह्रदयाचा शस्त्रक्रिया, न्यूरो (मेंदू) शस्त्रक्रिया, दंत शस्त्रक्रिया, डोळ्यांची शस्त्रक्रिया आणि एमआरआय आणि सीटी स्कॅनसारख्या विशेष चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये आता कोरोनावरील उपचारांचा देखील समावेश करण्यात आला आहे. मात्र आयुष्मान भारत योजनेंतर्गत कोणत्याही आजारावर उपचार घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागते. अशा परिस्थितीत जर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्यास आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
असा घ्या या योजनेचा लाभ
आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का हे जाणून घ्या. www.pmjay.gov.in वर किंवा 14555 आणि 1800111565 हेल्पलाईन नंबरवर कॉल करून ऑनलाईन पात्रता तपासता येईल. तुम्ही पात्र असाल तर आयुष्मान भारत योजनेशी संबंधित खासगी रुग्णालयात तुम्हाला कोरोना उपचार घेता येतील. तुम्हाला एखाद्या खासगी रुग्णालयात कोरोनासाठी quarantine करण्याची आवश्यकता असल्यास, त्यावरील खर्च देखील या विम्यात समाविष्ट करण्यात येईल.
योजनेचा फायदा घेण्यासाठी ही कागदपत्रे महत्वाची
आयुष्मान भारत योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीला ई-कार्डद्वारे किंवा इतर कागदपत्रांच्या मदतीने आपली ओळख दाखवणे आवश्यक आहे. किंवा त्या व्यक्तीकडे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा रेशनकार्ड अशी काही कागदपत्रे असतील तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेंतर्गत रूग्णाला मोफत उपचार मिळतात.