प्रत्येक भारतीयाकडे आवश्यक असलेल्या ओळखपत्रांपैकी आधार कार्ड हे एक महत्त्वाचे आहे. शाळेत अॅडमिशन घण्यापासून बँकेत खाते उघडणे, रेशनकार्ड, पासपोर्ट, घर-जमीन खरेदी विक्री, किंवा नोकरी, व्यवसाय यासाठी शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणुन आधार कार्ड गरजेचे आहे. सांगायचा मुद्दा म्हणजे, जन्माच्या दाखल्यापासून मृत्यू प्रमाणपत्रापर्यंत सर्वच सरकारी कामकाजासाठी आधार अनिवार्य आहे.
भारतातील प्रत्येकाकडे आता आधार कार्ड आहे. आधार कार्डचा आपल्याला कोणत्याही ठिकाणी आपले ओळखपत्र म्हणून वापरता येते. मात्र व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधारकार्डचे काय होते? हा प्रश्नच आहे.
अनेक देशांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर (After Death) त्या व्यक्तीची महत्वाची ओळखपत्र ही डिअॅक्टिव्हेट केली जातात. मात्र भारतात अजून असा कोणताही नियम लागू झालेला नाही. सध्य स्थितीत व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याचं आधार कार्ड हे सुरूच (Active) राहतं. म्हणजेच ते डिअॅक्टिव्हेट होत नाही.
आधार कार्ड व्यक्तीच्या मृत्यूनंतरही सुरू राहिल्याने त्याचा दुरूपयोग होण्याची शकता आहे. मात्र असं असलं तरी लवकरच आधार कार्ड निष्क्रिय करण्याचा नियम येऊ शकतो.
मृत्यू प्रमाणपत्रासोबतच आधार कार्ड होणार निष्क्रिय
आधार कार्ड देणारी संस्था यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आणि रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया सध्या यावर काम करत आहेत.
रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया ही संस्था देशातील जन्म आणि मृत्यू यांची नोंद ठेवत असते. या दोन्ही संस्था एकत्रित काम करतात. येत्या काळात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचं मृत्यू प्रमाणपत्र जारी करताना त्याच्या कुटुंबियांना माहिती दिली जाईल आणि त्यांच्या परवानगीनंतर आधार कार्ड निष्क्रिय करण्यात येणार आहे.