भारत नेपाळ सीमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच बिहारच्या अररियामध्ये भारत-नेपाळ सीमेवर तब्बल २८ मानवी सांगाडे आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जोगबनी येथील सीमेवरील नेपाळी लष्कराला हे मानवी सांगाडे सापडले आहे. एका चार चाकी वाहनामध्ये हे सांगाडे भरून ठेवण्यात आले होते. लष्कराकडून वाहनांची तपासणी सुरु असताना सांगाड्यांनी भरलेली हे वाहन सैन्याच्या हाती लागले. या घटनेमुळे आता परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना संकटामुळे भारत-नेपाळ सीमा गेली दीड वर्षांपासून बंद होती. मात्र हे संकट कमी होत असल्याने काही दिवसांपासून ती खुली करण्यात आली. मात्र या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर आता दोन्ही देशांच्या सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. दोन्ही बाजूंनी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी, चौकशी केली जात आहे.
४ ऑक्टोबरलच्या सायंकाळी उशिरा एक वाहन भारतातून नेपाळच्या दिशेने जात होते. यावेळी हे वाहन नेपाळच्या सीमेवर पोहचताच वाहनाची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यात हे मानवी सांगाडे आढळून आले आहेत. वाहनात मानवी सांगडे पाहून सैनिकांनीही धक्का बसला. या वाहनात मृत माणसांची मानवी कवटी, जांघेची हाडं सापडली आहेत. ही हाडं कोणत्या प्राण्यांची असल्याचा अंदाज यापूर्वी पोलिसांकडून वर्तवण्यात आला. मात्र नंतर ती हाडं माणसांची असल्याची माहिती स्पष्ट झाली आहे.
मात्र भारतीय सीमा सुरक्षा दलाकडून सांगाड्यांनी भरलेले हे वाहन भारतीय हद्दीतून गेलं नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सीमा सुरक्षा दलाने अलर्ट जारी करत कसून तपास करण्यास सुरुवात केली आहे.