घरCORONA UPDATEधक्कादायक: भारताच्या या शहरात ६ लाख कोरोनाबाधित असल्याचा अंदाज

धक्कादायक: भारताच्या या शहरात ६ लाख कोरोनाबाधित असल्याचा अंदाज

Subscribe

भारतात कोरोनाचे संक्रमण दिवसागणिक वाढत जात आहे. मुंबई सारख्या शहरात कोरोना आटोक्यात आला असला तरी भारतातील काही प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचा विस्तार होत आहे. यापुर्वी कोरोनाचे संक्रमण किती झाले, याचा अंदाज घेण्यासाठी स्वॅब टेस्ट, स्क्रिनिंग, अँटीजेन टेस्ट केल्या जात होत्या. मात्र हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर आणि आण्विक जीवशास्त्र (CCMB) या संस्थेने कोरोनाचा फैलाव जाणून घेण्यासाठी शहरातील सांडपाण्याची चाचणी केली आहे. मागच्या ३५ दिवसांपासून सांडपाण्याचे नमुने तपासले जात आहेत, या चाचणीतून तब्बल सहा लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा, असा अंदाज या संस्थेने वर्तविला आहे. ही संख्या तेलंगणा राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा सहापटीने अधिक आहे.

CSIR-CCMB आणि CSIR-IICT या संस्थांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणात मलनिस्सारण वाहिन्यातील नमुने गोळा केले होते. कोरोनाबाधित व्यक्तीच्या विष्ठेत कोरोनाच्या विषाणूचे अंश असतात. याच आधारावर हैदराबाद येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या ८० टक्के प्लँटमधून नमुने गोळा करण्यात आले. या सर्वेक्षणात जवळपास २ लाख लोकांच्या विष्ठेत कोरोना विषाणूचे कण दिसून आले आहेत. मानवी विष्ठेत ३५ दिवसांपर्यंत कोरोना विषाणूचे कण आढळून येतात. धक्कादायक बाब म्हणजे संपुर्ण तेलंगणा राज्याची कोरोनाबाधितांची संख्या ही एक लाखाच्या घरात असताना राजधानी हैदराबादमधील हे सर्वेक्षण खळबळजनक असे आहे.

- Advertisement -

हैदराबादमध्ये एकूण सांडपाण्याच्या केवळ ४० टक्के सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर शुद्धीकरणासाठी पोहोचते. ४० टक्के पाण्यात २ लाख नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. त्यामुळे उर्वरीत ६० टक्के सांडपाण्यातही कोरोनाचे कण असण्याची शक्यता या संस्थांनी वर्तविली आहे. त्यामुळेच हैदराबादमध्ये जवळपास ६ लाख लोक कोरोनाबाधित असल्याचा अंतिम अंदाज वर्तविण्यात येत असला तरी ही संख्या हैदराबादच्या लोकसंख्येच्या फक्त सहा टक्के आहे.

तेलंगणा राज्यात ९७,४२४ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २१, ५०९ रुग्णांवर उपचार सुरु असून ७५,१८६ रुग्ण बरे झाले आहेत. तर ७२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणाचे आरोग्य मंत्री इटेला राजेंद्र यांनी या सर्वेक्षणावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “सध्या राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयात खाटा रिकाम्या आहेत. याचा अर्थ कोरोना आता कमी होत आहे. CCMB आणि ICMR ने सर्वेक्षण केले आहे, मात्र ते आकलनाच्या पलीकडचे आहे. कारण मला तरी कोरोनाचे संक्रमण आणि मृत्यूदर कमी होताना दिसतोय.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -