कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना कोरोनाच्या चाचण्या मात्र भारतात वेगाने होत नसल्याची टीका अनेकदा करण्यात येत आहे. महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारवर देखील अशा प्रकारची टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर देशात कोरोनाच्या टेस्ट वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असतानाच आता आयसीएमआरने देशात एंटिजेन टेस्ट घ्यायला परवानगी दिली आहे. या टेस्टचे रिझल्ट अवघ्या अर्ध्या तासात मिळू शकतील. त्यामुळे टेस्टिंग करण्याचा वेग देखील वाढण्यासाठी मदत होऊ शकेल. सध्या केल्या जाणाऱ्या RT-PCR चाचण्यांचे निकाल येण्यासाठी ४ तासांचा अवधी लागत असून त्याच्या नमुन्यांच्या वाहतुकीसाठी मोठा वेळ लागत आहे.
आयसीएमआरकडून सोमवारी एंटिजेन टेस्टिंग किट्सला मंजुरी देण्यात आली आहे. या टेस्टचा उपयोग कंटेनमेंट झोन आणि हेल्थकेअर सुविधांमध्ये केला जाऊ शकतो. या टेस्टमध्ये कुठली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडली, तर त्या व्यक्तीची RTPCR टेस्ट करण्याची आवश्यकता भासणार नाही. या टेस्टच्या माध्यमातून फक्त अर्ध्या तासात नमुन्यांचा अहवाल मिळू शकतो.
या टेस्टमध्ये संभावित कोरोनाबाधिताच्या नाकातून स्वॅबचा नमुना घेतला जातो. त्यानंतर एका टेस्टिंग स्ट्रीपवर ठरवलेल्या ठिकाणी नमुन्याचे दोन थेंब टाकले जातात. १५ मिनिटांत जर स्ट्रीपचा रंग बदलला, तर त्यातून कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही, हे स्पष्ट होतं.
आजघडीला भारतात दिवसाला साधारण दीड लाख टेस्ट केल्या जात आहेत. त्यांचे अहवाल यायला सरासरी एक दिवसाचा कालावधी लागत आहे. त्यामुळे एंटिजेन टेस्टमुळे हा कालावधी बराच कमी होऊ शकेल. शिवाय, यामुळे टेस्टची संख्या देखील वेगाने वाढवणं शक्य होणार आहे.