दिल्लीने जर पीडीपी (पीपल्स डेमोक्रेटीक पार्टी) फोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी धमकी जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी भाजप सरकारला दिला आहे. भाजपच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेले मेहबुबा मुफ्ती यांचे सरकार भाजपाने पाडले. परंतु मुफ्तींच्या पीडीपीचे आमदार भाजपच्या संपर्कात आल्याने पीडीपीचे आमदार फुटणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. अशा परिस्थितीत मुफ्ती यांच्यासमोर पक्षाला एकजूट ठेवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. पक्षातील काही नेते फुटणार असल्याचे कळताच मुफ्तींनी अशा नेत्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. शुक्रवारी त्यांनी भाजपा आणि केंद्र सरकारला ‘आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील’ असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी सलाऊद्दीन आणि यासीन मलिक या दोन दहशतवाद्यांचाही दाखला दिला आहे.
If Delhi, tries to dismiss the voting rights of people like 1987, if it tries to create divisions & interfere like that then I think just like a Salahuddin and a Yasin Malik were born in 1987…if it tries to break PDP like that then outcomes will be dangerous:Mehbooba Mufti, J&K pic.twitter.com/vxmtVmFWqf
— ANI (@ANI) July 13, 2018
मुफ्तींनी दिले दहशतवाद्यांचे दाखले
मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपला आव्हान देताना १९८७ ची आठवण करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, ‘जर दिल्लीने १९८७ प्रमाणे लोकांच्या मतदान हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न केला, लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर जम्मू काश्मीरमधील परिस्थिती गंभीर होईल’. तसेच दहशतवाद्यांचे दाखले देत त्या म्हणाल्या की, ‘त्यावेळी (१९८७ मध्ये) एक सलाऊद्दीन आणि यासीन मलिक जन्माला आले होते, तेव्हा परिस्थिती चिघळली होती. यावेळी त्यापेक्षा भयंकर परिस्थितीला सामोरे जावे लागेल.
बंडखोरांवर कारवाई
मुफ्ती यांनी भाजपच्या संपर्कात असणाऱ्या, पक्ष सोडून जाण्याची शक्यता असणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच मुफ्ती यांनी पीडीपीचे विधानपरिषद सदस्य यासिर रेशी यांना बंदीपोरा जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवले. काही दिवसांपूर्वी यासिर यांनी माध्यमांसमोर मुफ्ती यांच्यावर टीका केली होती. यासिर पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ते त्यांच्यासोबत पक्षातील नेत्यांना बरोबर घेऊन जातील, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यांमुळे चिंताग्रस्त मुफ्ती यांनी यासिर यांची जिल्हध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात केली.