देशभरात कोरोना दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. यामुळे कोरोनाचा उद्रेक झाला असून आता दिवसाला ४ लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. तर ३ हजारांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असता आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे वैज्ञानिकांकडून सांगण्यात आले आहे. त्यासाठीची तयारी देखील सुरू केली आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागर के विजय राघवन यांनी दिली होती. पण जर कडक निर्बंध केले आणि योग्य ती खबरदारी घेतली तर कोरोनाची तिसरी लाट येण्यापासून रोखू शकतो, असा विश्वास आज के विजय राघवन यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.
‘आपण जर कडक निर्बंध केले, योग्य ती खबरदारी घेतली, तर कोरोनाची तिसरी लाट काही ठिकाणी किंवा सगळीकडेच येण्यापासून रोखू शकतो. परंतु त्यासाठी स्थानिक पातळीवर, राज्यांत, जिल्ह्यांत आणि सर्वत्र कडक निर्बंधांचे पालन होणे गरजेचे आहे,’ असे के विजय राघवन म्हणाले.
If we take strong measures, the third wave may not happen in all the places or indeed anywhere at all. It depends much on how effectively the guidance is implemented at the local level, in the states, in districts & in the cities everywhere: Principal Scientific Advisor to Centre pic.twitter.com/9SFcHOaFEW
— ANI (@ANI) May 7, 2021
बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत के विजय राघवन म्हणाले होते की, ‘कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरत आहे आणि तिसरी लाट येणे अटळ आहे. परंतु ती कधी येईल हे स्पष्ट झाले नाही. आपल्याला नवीन लाटेसाठी तयार राहिले पाहिजे. दरम्यान व्हायरसचा स्ट्रेन पहिल्या स्ट्रेनप्रमाणे पसरत आहे. यामध्ये नव्या प्रकारच्या संक्रमणाचे गुणधर्म नाही आहेत.’
दरम्यान आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत ४ लाख १४ हजार १८८ नवे कोरोनाबाधित आढळले असून ३ हजार ९१५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ लाख ३१ हजार ५०७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी १४ लाख ९१ हजार ५९८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २ लाख ३४ हजार ८३ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी ७६ लाख १२ हजार ३५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३६ लाख ४५ हजार १६४ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.
हेही वाचा – India Corona Update: दिलासादायक! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये पूर्वीपेक्षा रुग्णसंख्येचा वेग झाला कमी