बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चेन्नईत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या २४ तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे. चेन्नई तसेच नजीकच्या परिसरात पावसाचा परिणाम असणार आहे. चेन्नईसोबतच काचेपुरम, तिरूवल्लूर, चेंगलपेट या जिल्ह्यांमध्येही पावसाचा परिणाम असणार आहे. प्रादेशिक हवामान विभाग (आयएमडी) ने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. आज सायंकाळी ताशी ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हा परिणाम सहा तासांसाठी असेल असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा हा परिणाम आहे. आयएमडीने चेन्नईसाठी रेड अलर्ट घोषित केला आहे.
चेन्नईत एक ते दोन ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आयएमडीने दिला आहे. अतिवृष्टीचा परिणाम म्हणजे अनेक ठिकाणी नागरिकांना बोटीचा वापर करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची वेळ आली आहे. आयएमडीने दिलेल्या इशारानुसार उत्तर तामिळनाडूचा भाग आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याचा उत्तरेकडील भाग (करइकल आणि श्रीहरीकोटा) तसेच उत्तर पुद्दुचेरी याठिकाणी मोठ्य़ा प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आपत्कालीन मदतीचा भाग म्हणून नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) च्या ११ टीम आणि ७ डिझास्टर रिस्पॉन्सच्या टीम या तामिळनाडूत नेमण्यात आल्या आहेत.
चेन्नईत रात्रभर झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी १०० मिमी हून अदिक पावसाची नोंद झालेली आहे. पावसाचा परिणाम म्हणजे २१० ठिकाणी पाणी साचले होते. तर २१ ठिकाणी झाडे कोसळण्याच्याही घटना घडल्या. जवळपास १४४ ठिकाणी पंपाचा वापर करून याठिकाणचे साचलेले पाणी काढून टाकण्यात यश आले आहे. पावसाचा परिणाम म्हणजे अनेक ठिकाणी विजेचा पुरवठाही खंडीत होण्यावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याचा परिणाम हा हॉस्पिटलमधील विजेच्या पुरवठ्यावरही झाला आहे. पाण्याची वाढती पातळी पाहता अनेक रूग्णांना पहिल्या माळ्यावर स्थलांतरीत करण्यात आले आहे. पावसाचा परिणाम म्हणजे उपनगरीय लोकल वाहतूकही चेन्नई सेंट्रल ते तिरूवल्लूर दरम्यान खंडित करण्यात आली आहे. अंबातूर आणि आवडी दरम्यान पाणी साचल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे.