कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने देशभर हाहाकार माजवला होता. उत्तर प्रदेशातही या महामारीमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या या महाविनाशकारी दुसऱ्या लाटेदरम्यान उत्तर प्रदेशातील गंगा नदी प्रेत फेकण्याचे सोपे ठिकाण बनले होते. असा दावा आता ‘गंगा : रिइमेजिंग, रिजुनिएटींग, रिकनेक्टींग’ नावाच्या पुस्तकात करण्यात आलाय. NMCG महासंचालक आणि नमामि गंगे प्रकल्प प्रमुख राजीव रंजन मिश्रा आणि IDAS अधिकारी पुष्कल उपाध्ये यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान गंगेत तरंगणाऱ्या मृतदेहांमुळे यूपीच्या भाजप सरकारवर बरीच टीका झाली होती. पण सरकारने वारंवार या गोष्टी फेटाळून लावल्या. दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेशातही हजारो लोकांचा मृत्यू झाला. यादरम्यान गंगेत असंख्य मृतदेह वाहत असल्याचे दिसून आले. नदीत फेकलेले हे मृतदेह कोरोनाबाधितांचे मृतांचे असल्याचे सांगितले जात होते. मात्र सरकारने हा दावा वारंवार नाकारला. मात्र या पुस्तकामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला.
राजीव रंजन मिश्रा हे १९८७ च्या बॅचचे तेलंगणा-केडरचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी गंगा स्वच्छता मोहितेतील एका महत्त्वाच्या पदावर दोन टर्ममध्ये पाच वर्षांहून अधिक काळ सेवा केली आहे. पण ते ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांच्या हस्ते गुरुवारी ‘गंगा – रीइमॅजिनिंग, रीजुवेनेटिंग, रिकनेक्टिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या पुस्तकात महामारीदरम्यानच्या गंगा नदीच्या स्थितीचा उल्लेख आहे. ‘फ्लोटींग कॉर्पसेस: अ रिव्हर डिफ्लिड’ नावाच्या सदरात कोरोनामुळे गंगा नदीवर झालेल्या परिणामांवर भाष्य करण्यात आलं आहे. तसेच कोरोनामुळे मागील पाच वर्षांमध्ये नदी स्वच्छ करण्यासाठी केलेली मेहनत वाया गेल्याचे म्हटलेय.
या पुस्तकात पुढे म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान गंगा नदीत मृतदेह टाकण्याचे प्रमाण वाढलं होतं. यावेळी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अग्नी देण्यासाठी घाटावर दिलेल्या सुविधा अपुऱ्या पडल्या. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ही स्थिती होती. यामुळे गंगा नदी मृतदेहांचं डम्पिंग ग्राऊंड झाल्याचं पाहायला मिळालं असा उल्लेखही या पुस्तकात करण्यात आलाय.
एकीकडे गंगा नदीतील मृतदेहांची संख्या वाढतेय आणि दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने पुरवलेल्या आकडेवारीचा संदर्भ या पुस्तकात देण्यात आलाय. या आकडेवारीनुसार ३०० हून अधिक मृतदेह गंगेत सोडलेले नाहीत. तर वृत्तांप्रमाणे हजारांहून अधिक मृतदेह टाकण्यात आले नसल्याचे आकडेवारीत म्हणण्यात आल्याचा उल्लेख पुस्तकात आहे.
दरम्यान अनेक वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे आणि सोशल मीडियावर गंगा नदीमध्ये तरंगणाऱ्या मृतदेहांचे फोटो आणि वृत्तांकन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. ही घटना फार ह्रदयद्रावक होती. गंगा स्वच्छता मोहिमेचा अध्यक्ष म्हणून गंगा नदीच्या संरक्षणाची जबाबदारी माझी होती. असंही मिश्रा यांनी पुस्तकात म्हटलेय.