आर्ट ऑफ लिव्हिंगची सह संस्था असलेल्या व्यक्ती विकास केंद्रामार्फत राज्यात गावांमध्ये पुनर्भरण विहिरी निर्माण करून भूजल पातळी वाढवण्यासाठी जलतारा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाला काल आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांनी भेट दिली. त्यानंतर ते उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे आले होते. तुळजापूरमध्ये रविशंकर यांच्या ‘जागर भक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र या कार्यक्रमावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला तसेच, त्यांनी श्री श्री रविशंकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (In Tuljapur Hassle In Shri Shri Ravishankars Program Osmanabad Sambhaji Brigade Protest)
नेमके प्रकरण काय?
आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य केले होते. श्री श्री रवीशंकर यांनी फार अगोदर केलेल्या विधानाचा निषेध करत काल संभाजी ब्रिगेडने आंदोलंनाचा इशारा दिला होता. त्यामुळे कार्यक्रमस्थळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही काही कार्यकर्त्यांनी श्री श्री रवीशंकर यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, एकीकडे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा संताप असताना दुसरीकडे या घटनेनंतर रवीशंकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच, त्यांना कार्यकर्त्यांना प्रेमाने वागण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या कामाचीही स्तुती केली. कार्यक्रमाच्या शेवटी श्री श्री रविशंकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या कामाची स्तुती केली. तसेच इतिहासकारांच्या वेगवेगळ्या लिखानामुळे काही चुका झाल्या तर त्याकडे दुर्लक्ष करून आपण मिळून काम करू, असा प्रेमाचा सल्ला श्री श्री रविशंकर यांनी दिला.
हेही वाचा – पुण्यात शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीची आत्महत्या; कौटुंबिक वादातून पाऊल उचलल्याची चर्चा