उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेनंतरही बलात्कारांचं सत्र सुरुच आहे. या घटनांमुळे देशात संतापाचं वातावरण आहे. दरम्यान, राजस्थानचे पोलीस महासंचालक भूपेंद्रसिंग यादव यांनी, वाढती लोकसंख्या, इंटरनेट, तरुणांमधील कुतूहल यामुळे बलात्काराच्या घटना वाढत असल्याचं म्हटलं आहे. शिवाय, आता मालमत्ता वाद किंवा परस्पर वाद मिटविण्यासाठी गैरव्यवहारांचे क्रॉस केसेस दाखल केले जात आहेत, जो एक नवीन ट्रेंड बनत असल्याचं म्हणाले. मात्र, पीडितेला न्याय मिळण्यास उशीर होतो, ही गंभीर बाब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पोलीस महासंचालक भूपेंद्रसिंग यादव म्हणाले की, इंटरनेटवर गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या, गुन्हेगारीसाठीच्या कल्पना मोठ्या प्रमाणात प्रसारित केल्या जात आहेत. पोलिसांनी त्यांच्या पातळीवर डझनभर साइट्स हटवल्या आहेत. साइट्स काढून टाकल्यानंतरही नवीन साइट्स तयार केल्या जातात, ज्यावर पोलीस विभाग पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
राजस्थानमध्ये हिंसाचार वाढत आहेत. याची अनेक कारणे असू शकतात, ज्यात लोकसंख्या, बेरोजगारी आणि गुन्हेगारीच्या कृतींसाठी इंटरनेटकडून प्रेरणा घेणे. पोलीस अधिकाधिक मुलांना प्रशिक्षण देण्यावर भर देत आहेत आणि इंटरनेटचा उपयोग फक्त सकारात्मक कृतीसाठीच केला पाहिजे, असं कुटुंबातील सदस्यांनीही सांगितलं पाहिजडे, असं भूपेंद्रसिंग यादव म्हणाले. सायबर क्राईम रोखण्यासाठी नवीन कृती आराखडा तयार केला जात आहे आणि एक नवीन कक्ष तयार करण्यात आला आहे. त्यात बाहेरील तज्ज्ञांचादेखील समावेश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या गुन्ह्यांवर नजर ठेवली जाईल आणि अर्थातच सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या गुन्ह्यांवर लगाम घालणे फार महत्वाचं आहे.