नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत झालेल्या जी-20 परिषदेनिमित्त आयोजित स्नेहभोजनाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी झाल्या होत्या. पण आता त्यावरून वाद निर्माण झाला आहे. विरोधकांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’तील काँग्रेसने याबाबत आक्षेप घेतला आहे. तर, त्याला तृणमूल काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे मुंबईत झालेल्या तिसऱ्या बैठकीला एक महिना होत नाही तोच आघाडीत कुरबुरी सुरू झाल्याचे चित्र आहे.
हेही वाचा – JDS च्या देवगौडांच्या हाती आता ‘कमळ’; आगामी निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शुक्रवारी दिल्लीला गेल्या होत्या, तर दुसऱ्या दिवशी (शनिवारी) जी-20 बैठकीच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या डिनरला इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या (TMC) नेत्या ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जीं यांच्या या निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या निर्णयामुळे नरेंद्र मोदी सरकारविरोधातील त्यांची भूमिका कमकुवत होणार नाही का, असा सवाल त्यांनी केला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याकडे दुसरे काही कारण आहे का? असा प्रश्न देखील पश्चिम बंगालचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी केला.
अनेक बिगर-भाजपा मुख्यमंत्र्यांनी डिनरला जाण्याचे टाळले, तर ममता बॅनर्जी एक दिवस आधी दिल्लीला रवाना झाल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह ममता बॅनर्जी जी-20निमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होत्या. अशा कोणत्या गोष्टीने त्यांना प्रवृत्त केले की, त्या या नेत्यांसोबत डिनरला उपस्थित राहण्यासाठी थेट दिल्लीला रवाना झाल्या, याबाबत अधीर रंजन चौधरी यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्या गेल्या नसत्या तरी चालले असते, आभाळ कोसळले नसते, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली.
हेही वाचा – ढोंगीपणाचीही सीमा असते… ‘भारत’ नावावरून संजय राऊत यांचा भाजपावर निशाणा
तृणमूल काँग्रेसचे प्रत्युत्तर
तृणमूल काँग्रेसनेही काँग्रेसच्या या आक्षेपाला उत्तर दिले आहे. ममता बॅनर्जी या विरोधी आघाडीच्या ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुझिव्ह अलायन्स’च्या (इंडिया) शिल्पकारांपैकी एक आहेत, हे सर्वांना माहीत आहे आणि त्यांच्या बांधिलकीवर कोणीही शंका घेऊ शकत नाही. शिवाय, प्रशासकीय दृष्टिकोनातून पाळल्या जाणार्या काही प्रोटोकॉलबद्दल काँग्रेस नेत्याने ममता बॅनर्जी यांना व्याख्यान देण्याची आवश्यकता नाही. तसेच प्रोटोकॉलनुसार राज्याचे मुख्यमंत्री जी -20 डिनरला उपस्थित राहण्यासाठी केव्हा जातील याचा निर्णय चौधरी यांनी घेऊ नये, असे तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार शांतनू सेन सुनावले आहे.