नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी विरोधकांनी ‘इंडिया’ (INDIA) आघाडी केली असली तरी, आतापासूनच कुरबुरी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. जी-20च्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनावरून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगला होता. तर, आता काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (AAP) या दोन पक्षांमध्ये एकमेकांवर कुरघुड्या सुरू असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा – संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी नव्या ड्रेसकोडची चर्चा; कर्मचारी दिसणार नव्या पोशाखात
विरोधकांच्या आघाडीत काँग्रेस आणि आप या दोघांचाही समावेश असला तरी आपने राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आदी राज्यांत निवडणूक लढवण्याची घोषणा करून काँग्रेसची चिंता वाढवली आहे. दुसरीकडे, गुजरातमध्ये काँग्रेसकडून आपला एकापाठोपाठ एक धक्के दिले जात आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक बडे नेते ‘आप’ सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले असून, आगामी काळातही हाच ट्रेंड कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या दोन्ही पक्षांनी यावर काहीही बोलणे टाळले आहे.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने गुजरातमध्ये 5 जागा जिंकल्या होत्या. आपचे प्रदेश उपाध्यक्ष अर्जुन राठवा यांच्याबरोबरच मयंक शर्मा आणि विशाल पटेल यांनी आपचा राजीनामा दिला आहे. शर्मा हे छोटा उदेपूर लोकसभा प्रभारी होते आणि वडोदरातील आम आदमी पार्टीचे एक प्रमुख नेते होते. विशाल पटेल हे वडोदरा येथील युवा शाखेचे प्रमुख होते. दोन्ही नेत्यांचा राजीनामा हा आम आदमी पक्षाला धक्का मानला जात आहे. लोकसभा निवडणुकांच्या तयारीत पक्ष गुंतलेला असताना हे दोन धक्के बसले आहेत.
हेही वाचा – मोदींनी जग जिंकून काय फायदा? मराठा आरक्षणावरून ठाकरे गटाचा मुख्ममंत्र्यांवर निशाणा
आम आदमी पार्टी सोडून गेलेले नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. गेल्या महिन्यात आप सोडणारे ज्येष्ठ नेते भेमाभाई चौधरी यांनी आपल्या समर्थक आणि स्थानिक नेत्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गेल्या आठवड्यात अर्जुन राठवा यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष शक्तीसिंह गोहिल आणि जिग्नेश मेवाणी यांचीही भेट घेतली आहे. लवकरच ते काँग्रेसशी हातमिळवणी करणार असल्याचे मानले जात आहे. मयंक शर्मा आणि विशाल पटेल हे दोघेही काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा – युक्रेनइतकीच मणिपूरची मनुष्यहानी महत्त्वाची, ठाकरे गटाचे मोदी सरकारवर शरसंधान
एकत्रित लढण्याची आपने केली होती घोषणा
आम आदमी पार्टी गुजरातमधील आगामी निवडणुका काँग्रेससोबत लढणार असल्याची घोषणा आपचे नेते इसुदान गढवी यांनी नुकतीच केली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचे ते उमेदवार होते. मात्र, ही घोषणा म्हणजे घाई असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. दोन्ही पक्षांनी राष्ट्रीय स्तरावर ‘इंडिया’ आघाडीअंतर्गत एकत्र लढण्याचे मान्य केले असले तरी, दिल्ली, पंजाब, गुजरातसह अनेक राज्यांत दोन्ही पक्षांमध्ये मतभेद आणि विरोधाभास दिसून येत आहेत.