पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवर अजूनही तणाव कायम आहे. लष्करी पातळीवरील अनेक चर्चानंतरही चिनी सैन्य पुर्णपणे मागे हटलेलं नाहीये. चीन बरोबर दीर्घकाळ ही तणावाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने भारतीय लष्कराने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. कदाचीत हिवाळ्यापर्यंत ही स्थिती अशीच राहू शकते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
पण लडाखसारख्या ठिकाणी कडाकाच्या थंडीमध्ये पहारा देणं सोपं नाहीये. कारण या कडाक्याच्या थंडीत ड्युटी करताना भारतीय सैन्याला विशेष कपडे, शेल्टर्स, तंबू, इंधन आणि इतर साहित्यांची गरज भासणार आहे. पूर्व लडाखमध्ये तैनात असलेल्या जवानांसाठी पुरेसे धान्य आणि अन्य आवश्यक साहित्य पुरवण्याची प्रक्रिया भारतीय सैन्याने सुरु केली आहे
लडाखमध्ये तैनात असणाऱ्या सैन्यासाठी वर्षाला एकूण ३० हजार मेट्रीक टन रेशनची गरज लागत असेल, तर आता दुप्पट रेशनची गरज लागणार कारण तिथे आता अतिरीक्त सैन्य तुकड्या तैनात केल्या आहेत. चीन लगेच मागे हटणार नाही. त्यामुळे आम्ही दीर्घकाळाच्या दृष्टीने तयारी करत आहोत. हिवाळयात लागणाऱ्या आवश्यक साहित्याचा स्टॉक करुन ठेवणे सुद्धा सुरु आहे” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मिग – २९ के तैनात
भारतीय नौदलाकडून उत्तरेकडील इंडियन एअर फोर्सच्या महत्त्वाच्या तळांवर मिग-२९के फायटर विमानांची तैनाती सुरु आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यात ४० पेक्षा जास्त मिग-२९के विमाने आहेत. त्यात १८ विमाने आयएनएस विक्रमादित्य या एकमेव विमानवाहू युद्धनौकेवर तैनात आहेत. उर्वरित मिग-२९ के विमाने गोवा येथील नौदलाच्या बेसवर असतात. ही मिग-२९ के विमाने मूळची रशियन बनावटीची आहेत. गोव्यातील नौदलाच्या बेसवरुन काही विमाने उत्तरेकडील इंडियन एअर फोर्सच्या तळावर हलवली आहेत.
हे ही वाचा – गलवान खोऱ्यात वीरमरण आलेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी झाल्या डेप्यूटी कलेक्टर!