प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) वर भारतीय सैनिकांची ताकद आता आणखी वाढविण्यात आली आहे. भारताने सीमेवर निर्भय, ब्रह्मोस, आकाश क्रूझ क्षेपणास्त्र तैनात केले आहे. निर्भय १००० किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता ठेवते. तिबेटमधील चीनच्या ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी निर्भय अतिशय सक्षम असल्याचे सांगितले जात आहे. ५ महिन्याहून अधिक काळ भारत आणि चीन सीमेवर तणावाची परिस्थिती बनलेली आहे. लडाख आणि काही ठिकाणी दोन्ही देशांचे सैनिक तर एकमेकांसमोर आलेले पाहायला मिळाले. अशा तणावाच्या परिस्थितीत भारतानेही आपले सर्वात सक्षम आणि विश्वासू क्षेपणास्त्र तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
निर्भयची खासियत काय?
निर्भय क्षेपणास्त्राची तुलना अमेरिकेच्या प्रसिद्ध टॉपहॉक क्षेपणास्त्राशी केली जाते. निर्भय न भरकटता आपल्या लक्ष्यावर अचूक मारा करण्यासाठी ओळखला जातो. निर्भयचे डिझाईन आणि बनावट पुर्णपणे भारतीय आहे. याचे पहिले परिक्षण १२ मार्च २०१३ रोजी केले गेले होते. निर्भय पारंपरिक रॉकेट प्रमाणे पहिल्यांदा सरळ आकाशात झेपावते आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ९० अंश कोनात आपल्या लक्ष्याकडे झेपावण्यासाठी तयार होते. निर्भयची लांबी ६ मीटर असून त्याची जाडी ०.५२ मीटर एवढी आहे. तर त्याचे वजन १५०० किलो एवढे असून तब्बल १००० किमी पर्यंत मारा करण्याची त्याची क्षमता आहे.
भारताचे सर्वात घातक क्षेपणास्त्र ब्रह्मोस
ब्रह्मोस हे हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारे घातक असे क्षेपणास्त्र आहे. ब्रह्मोसवर ३०० किलोचा दारुगोळाही वाहून नेण्याची क्षमता आहे. लडाखच्या सीमेवर पुरेशा ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यात आला आहे.
एका वेळी ६४ टार्गेटना ट्रॅक करणारा आकाश
भारतीय सैन्याने आकाश हे तिसरे क्षेपणास्त्र देखील सीमेवर तैनात केले आहे. चीनच्या PLA विमानांचा बंदोबस्त करण्यासाठी आकाशचा वापर केला जाऊ शकतो. आकाश क्षेपणास्त्र एकावेळी ६४ लक्ष्यांवर लक्ष ठेवू शकते. तर १२ विमानांशी एकत्र लढण्याची त्याची क्षमता आहे.