नवी दिल्ली : भारत-जपान शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी दोन्ही देशांचे लष्करी आणि आर्थिक सहकार्य आणखी वाढवणार असल्याचे मान्य केले आहे.
जागतिक भू-राजकीय वातावरण झपाट्याने बदलत असताना किशिदा यांची वर्षभरात दुसरी भारत भेट आहे. मोदी आणि किशिदा यांनी भारत आणि जपान यांच्यात लष्करी आणि आर्थिक क्षेत्रात तसेच ऊर्जा आणि डिजिटल क्षेत्रात बहुआयामी सहकार्यासाठी वचनबद्धता दर्शवली आहे. त्यामुळे मोदी आणि किशिदा भारत-जपान संबंधांना किती महत्त्व देत आहेत हे आज झालेल्या भेटीवरून समजू शकते. कारण गेल्या वर्षभरातील किशिदा यांची ही चौथी भेट आहे.
किशिदा जी-20 बैठकीतही होणार सहभागी
मोदी आणि किशिदा हे दोघे मे 2022 मध्ये जपानमधील G-7 बैठकीदरम्यान भेटणार आहेत. यासाठी पंतप्रधान किशिदा यांनी मोदींना निमंत्रण दिले असून मोदींनी ते स्वीकारले आहे. यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये किशिदा पुन्हा एकदा G-20 बैठकीत सहभागी होण्यासाठी भारतात येणार आहेत. मोदींनी जपानला आशियातील भारताचा सर्वात नैसर्गिक भागीदार म्हणून वर्णन केले आहे, तर किशिदा यांनी आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रातील शांततेसाठी या दोन देशांमधील संबंध अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.
किशिदा यांची भेट घेतल्यानंतर मोदी म्हणाले की, भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी आमच्या सामायिक लोकशाही मूल्यांवर आधारित आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कायद्याचे राज्य स्थापित केले आहे. संरक्षण उपकरणे, आरोग्य, व्यापार, तंत्रज्ञान तसेच सेमीकंडक्टर आणि इतर संवेदनशील तंत्रज्ञानामध्ये विश्वासार्ह पुरवठा साखळी स्थापन करण्याबाबत आम्ही अर्थपूर्ण चर्चा केली आहे.
3.20 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक वाढवण्याचे लक्ष्य
दोन्ही नेत्यांनी 2022 मध्ये जपानी कंपन्यांकडून भारतात 3.20 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मोदी आणि किशिदा यांनी याचा आढावा घेतला असून आतापर्यंत झालेल्या प्रगतीवर पंतप्रधान मोदींनी समाधान व्यक्त केले आहे.
जपानसोबत संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या वतीने विशेष भर देण्यात आली आहे. परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा सांगतात की, दोन्ही देशांदरम्यान संरक्षण क्षेत्रात संशोधन आणि डिझाइनिंगपासून उत्पादनापर्यंतचे क्षेत्र विस्तृत आहे. भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत संरक्षण क्षेत्रात जपानचे सहकार्य घेता येईल.
दोन्ही देशांचे ‘टू प्लस टू’ संरक्षण क्षेत्रावर काम
दोन्ही देशांच्या तिन्ही लष्करांमध्ये सराव आणि प्रशिक्षणाबाबत काम सुरू झाले आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांनी स्थापन केलेली ‘टू प्लस टू’ समिती संरक्षण क्षेत्रातील सहकार्यासाठी रोडमॅपवर ठळकपणे काम करत आहे. जपानने अलीकडेच आपले संरक्षण बजेट दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याच्या शक्यता वाढल्या आहेत.
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या चौथ्या हफ्त्यावर करार
अमेरिकेनंतर जपान भारताकडे भविष्यातील विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. जपानच्या मदतीने उभारण्यात येत असलेल्या अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आर्थिक मदतीचा चौथा हप्ता देण्याबाबत दोन्ही पंतप्रधानांसमोर करारही झाला आहे. जपानची एजन्सी जपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सी (JICA) हा हप्ता म्हणून 18 हजार कोटी रुपये देणार आहे.