कोरोना विषाणुचा संसर्ग माणसामध्ये कसा झाला? जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला रोखण्यासाठी कोणती पावले उचलली आणि त्याची भूमिका काय आहे? अशाच प्रश्नांची उत्तरे जगातील जवळपास ६२ देश शोधत आहेत. आता या देशांना पाठिंबा देत युरोपियन युनियन आणि ऑस्ट्रेलियान वतीने चौकशीच्या मागणीसाठी केलेल्या ठरावावर भारताने अधिकृतपणे स्वाक्षरी केली आहे.
दरम्यान आजपासून जागतिक आरोग्य संघटनेची ७३वी जागतिक आरोग्य सभा सुरू होणार आहे. या वार्षिक सभेमध्ये हा ठराव सादर केला जाणार आहे. या ठरावाच्या माध्यमातून निष्पक्ष, स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. या ठरावाला भारताने पहिल्यांदाच उघडपणे पाठिंबा दिला आहे. चीनच्या वुहान शहरातून कोरोना विषाणू पसरण्यास सुरुवात झाली होती. आतापर्यंत या जीवघेण्या कोरोना विषाणूमुळे तीन लाखांहून अधिक लोकांना मृत्यू झाला आहे.
मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० परिषदेत जागतिक आरोग्य संघटनेमधील बदल आणि अधिक पारदर्शकता आणण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते.
या महामारीच्या संकटात सुरुवातीपासून चीनवर कोरोनासंदर्भात माहिती लपवल्याचा आरोप केला जात आहे. तसंच या काळात महत्त्वाची भूमिका बजावणारे उच्च अधिकारी डॉ. झोंग नानशान यांनी देखील स्थानिक अधिकाऱ्यांनी कोरोना संबंधित माहिती लपवून ठेवल्याचा खुलासा केला आहे. मात्र चीनने हे आरोप फेटाळले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी चीनची बाजू घेतल्याचा आरोप केला जात आहे. इथोपियामधील माजी मंत्री घेब्रेयेसुस आहेत. चीनच्या पाठिंब्यामुळे २०१७मध्ये त्यांची जागातिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकपदी निवड झाली होती.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीच्या प्रस्तावित आराखड्यास बांगलादेश, कॅनडा, रशिया, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, जपान यासह ६२ देशांनी पाठिंबा दर्शविला आहे. मात्र यामध्ये चीन किंवा वुहान शहराचा उल्लेख नाही.
हेही वाचा – LockDown 4.0: आजपासून देशाची विभागणी तीन झोनऐवजी पाच झोनमध्ये