कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात कहर केला आहे. यामुळे हजारो स्थलांतरित मजुरांनी आपल्या घरचा रस्ता धरला आहे. मुंबईतील अनेक मोठ्या रेल्वे स्थानकाबाहेर शेकडो किलोमीटरच्या रांगा लावून मजुरांचे आपल्या राज्यात पोहचण्यासाठी धडपड सुरु झाली आहे. दादर, सीएसएमटी, बोरिवली, वांद्रा रेल्वेस्थानकाबाहेर मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळतेय. कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनदरम्यान मजुरांचे हाल होऊन नये यासाठी भारतीय रेल्वेने ७० टक्के क्षमतेने गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय रेल्वे प्रशासन लवकरंच १३३ नव्या रेल्वे गाड्या सुरु करण्याची योजना आखत आहे. ज्यामध्ये ८८ समर स्पेशल आणि ४५ या उत्सव स्पेशल ट्रेन आहेत. पुढच्या दोन आठवड्यात या गाड्या सुरु होणार आहे. भारतीय रेल्वेने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रेल्वेने जवळपास ९६२२ स्पेशल ट्रेन सुरु करण्याची परवानगी दिली आहे. ज्यामध्ये साप्ताहिक ट्रेनचा समावेश आहे. दररोज राज्यातून ७७४५ ट्रेन धावत आहेत. रेल्वे प्रशासनाने गोरखपूर, पटना, दरभंगा, वाराणसी, गुवाहाटी, प्रयागराज, रांची, लखनऊ यांसारख्या अनेक राज्यांमध्ये अतिरिक्त रेल्वे गाड्या सुरु केल्या आहेत.
महाराष्ट्र, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे स्थलांतरित मजुरांना हाताला काम नसल्याने मोठ्या संख्येने मजुर स्थलांतर करत आहेत. याचपार्श्वभूमीवर रेल्वेने अतिरिक्त ट्रेन सुरु केल्या आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात राज्यांतून सर्वाधिक स्थलांतर सुरु आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये जाणाऱ्या मजुरांची संख्या सर्वाधिक आहे, त्याचबरोबर ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यात जाणाऱ्या मजुरांचीही संख्या अधिक आहे.
गेल्यावर्षी लागू झालेल्या लॉकडाऊनदरम्यान लाखो मजुरांचे हाल झाले. रेल्वे बंद होण्याच्या अफवेमुळे लाखो मजुरांनी पाई जाण्याच्या मार्ग निवडला. य़ात अनेक मजुरांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे आत्तांच्या लॉकडाऊनमध्ये मजुरांचे हाल होऊ नये यासाठी रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या आहेत.