आज जागतिक अन्न दिवस असून यासंबंधीची एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नुकतीच ११७ देशांचा समावेश असलेल्या ग्लोबल हंगर इंडेक्सची आकडेवारी प्रसिद्ध झाली असून यामध्ये भारताला १०२ वे स्थान मिळाले आहे. या यादीत असलेल्या दक्षिण आशियाई देशांमध्ये भारताला शेवटचे स्थान मिळाले आहे. भारताव्यतिरिक्त इतर आशियाई देश या क्रमवारीत ६६ ते ९४ क्रमांकांदरम्यान आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या क्रमवारीत पाकिस्तानही भारताच्या पुढे आहे. २०१५ मध्ये ग्लोबल इंडेक्समध्ये भारताचे स्थान ९३ व्या क्रमांकावर होते. त्यावेळी पाकिस्तानचे स्थान भारतापेक्षा खाली होते. मात्र यावेळी पाकिस्तानने भारतापेक्षा प्रगती करत ९४ वा क्रमांक पटकावला आहे.
ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये समावेश असलेल्या ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) गटातील देशांचा विचार केल्यास या देशांमध्ये भारत खुप मागे आहे. २०१४ ते २०१८ या काळात एकत्रित करण्यात आलेल्या माहितीवरून ग्लोबल हंगर इंडेक्सची क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. एकत्रित करण्यात आलेल्या माहितीमध्ये विविध देशातील कुपोषित मुलांची संख्या, कमी वजन आणि वयाच्या तुलनेत कमी उंची असलेले पाचन वर्षांपर्यंतच्या मुलांची संख्या आणि पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचा मृत्यूदर यांचा समोवश असतो.
या अहवालानुसार भारतात ६ ते २३ महिने वयोगटातील केवळ ९.६ टक्के मुलांनाच किमान योग्य आहार उपलब्ध होतो. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नव्या अहवालात हा आकडा केवळ ६.४ असल्याचे नमूद करण्यात आले आहे.