मुंबई : सध्या सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांमध्ये एक वेगळे राजकारण रंगले आहे. विरोधकांच्या आघाडीने ‘इंडिया’ असे नाव धारण केल्यानंतर मोदी सरकारने सरकारी कागदपत्रांवर ‘भारत’ असा उल्लेख करण्यास सुरुवात केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ‘X’ हॅण्डलवरून भाजपावर निशाणा साधला आहे.
नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर गरिबीला श्रीमंती, बेरोजगार युवकाला नोकरीवाला, महागाईला स्वस्त, भ्रष्टाचाराला सुशासन, खराब रस्त्यांना चकाचक रस्ते, आत्महत्येला इच्छामरण, हुकुमशाहीला लोकशाही म्हणायला हवं.
देशाच्या मुलभूत समस्या सोडवण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी भावनिक राजकारण करायचे…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 7, 2023
गुवाहाटी येथे एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशाला इंडिया नव्हे, तर भारत म्हणावे, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद मोदी सरकारने सरकारी कागदपत्रांमध्ये तसा उल्लेख करण्यास सुरुवात केली राजधानी दिल्लीत येत्या शनिवारी आणि रविवारी जी-20 शिखर परिषद होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या परिषदेसाठी येणार्या विदेशी पाहुण्यांना जेवणाचे निमंत्रण पाठवले आहे. या निमंत्रणपत्रिकेत ‘रिपब्लिक ऑफ इंडिया’ऐवजी ‘रिपब्लिक ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून विरोधकांनी भाजपाला लक्ष्य करत, ‘इंडिया’ला घाबरल्यामुळे हा बदल केल्याचा दावा केला आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केले आहे. नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर गरिबीला श्रीमंती, बेरोजगार युवकाला नोकरीवाला, महागाईला स्वस्त, भ्रष्टाचाराला सुशासन, खराब रस्त्यांना चकाचक रस्ते, आत्महत्येला इच्छामरण, हुकुमशाहीला लोकशाही म्हणायला हवे, अशी उपोधिक टीका त्यांनी केली आहे.
हेही वाचा – अण्णांसारखं जरांगेंना गुंडाळता येणार नाही; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
देशाच्या मुलभूत समस्या सोडवण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी भावनिक राजकारण करायचे आणि देशाचे मूळ मुद्दे चर्चेतून बाजूला सारायचे हाच एकमेव अजेंडा हे सरकार चालवत आहे. त्यामुळे महागाई, बेरोजगारी, शिक्षण, दुष्काळ या विषयांना प्राधान्य द्यावे की नावे बदलण्याच्या चर्चेला प्राधान्य द्यावे, हे आता जनतेनेच ठरवायला हवे. मीडिया व सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी मूळ मुद्द्यांना बाजूला सारण्याचा सरकारच्या या जाळ्यात न अडकता मूळ मुद्द्यांवरच चर्चा करायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.