कोरोना महामारीमुळे भारतासह संपूर्ण जगाला मोठ्या संकटातून जावे लागले. यात कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे देशाचे अर्थचक्र बिस्कळीत झाले. भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे ठासळली. मात्र दोन वर्षांनंतर ही आर्थिक स्थिती पुर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या कोरोना काळात देशाचे किती नुकसान झाले आणि हे नुकसान भरू काढण्यासाठी किती वर्षे लागणार याबाबत भारताची मध्यवर्ती बँक आरबीआयने एक नाव रिपोर्ट जारी केला आहे.
या रिपोर्टनुसार, कोरोना महामारीमुळे गेल्या तीन वर्षात भारताचे जवळपास 50 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे झालेले हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी जवळपास 10 ते 12 वर्षांचा काळ लागेल असे आरबीआयने स्पष्ट केलेय. आरबीआयने रिपोर्टमध्ये पुढे म्हटले की, 2034 ते 2035 पर्यंत देशाचे कोरोनामुळे झालेले नुकसान भरून काढता येईल असा अंदाज आहे.
दरम्यान देशात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने सर्व निर्बंध हटवण्यात आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या पून्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश ,कर्नाटक अशा अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे.
आरबीआयच्या या रिपोर्टनुसार, कोरोनामुळे गेल्या तीन वर्षात अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. आता रुग्णसंख्या कमी असल्याने सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र तरी देखील अर्थव्यवस्था सुधारणा वाढीचा वेग कमी आहे. यामागे रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे कारण देखील सांगितले जात आहे. कारण या युद्धाचा परिणाम केवळ भारतालाच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला देखील सहन करावा लागतोय. महागाई प्रचंड प्रमाणात वाढतेय. भारताला देखील या महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. अनेक वस्तूंच्या आयात निर्यातीवर युद्धाचा परिणाम दिसून येतोय.