देशात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढतच असून दिवसाला एक लाखाहून अधिक रुग्ण सापडत आहेत. याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित चिंता व्यक्त केली आहे. या पत्रात आयएमएने देशातील १८ वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याची तात्काळ परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. या पत्रात असोसियएशनने सहा महत्त्वाच्या मुद्दांना पंतप्रधानांनी तात्काळ परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनने या पत्रात नमुद केले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखाली कोरोनाविरुद्धचा लढा सुरु असतानाच देशात वाढणारी रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे असे म्हणत खेद व्यक्त केला. तसेच पुढे देशामध्ये सध्या ७ लाख ४० हजार अॅक्टीव्ह कोरोना रुग्ण आहेत. कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून ४ एप्रिलला पहिल्यांदाच १ दिवसात एक लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाची संसर्ग सुरु झाल्यानंतरची सर्वात मोठी वाढ असल्याचे म्हणत एकंदरीत कोरोना परिस्थितीसंदर्भात चिंता आयएमएने व्यक्त केली.
आत्तापर्यंत देशात ७ कोटी ९१ लाख व्यक्तींना लस दिली असून यातील ६ कोटी ८६ लाख व्यक्तींना लसीचा पहिला डोस तर १ कोटी ५ लाख व्यक्तींना लसीचा दुसरा डोस दिला आहे. सध्या ४५ वर्षावरील नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे. मात्र संसर्ग ज्या वेगाने पसरतोय ते पाहता लसीकरणाची गती वाढवली पाहिजे आणि १८ वर्षावरील सर्व व्यक्तींना लस देण्याची तात्काळ परवानगी दिली पाहिजे अशी मागणी केली आहे. तसेच नागरिकांना घरापासून चालत जात येईल एवढ्या अंतरावर लसीकरण केंद्र असावे यासाठी खासगी रुग्णालय आणि क्लिनिकची मदत घेतली पाहिजे. यात प्रत्येक डॉक्टरांना लसीकरणाची सोय उपलब्ध करुन दिली तर लसीकरण मोहिमेत सकारात्मक परिणाम दिसून येईल. असा विश्वास आयएमएने व्यक्त केला.
Indian Medical Association writes to Prime Minister Narendra Modi suggests “gearing up of COVID19 vaccination drive with immediate effect and permit those above 18 years to receive vaccine”. pic.twitter.com/1mMpfC5e4y
— ANI (@ANI) April 6, 2021
तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनने या पत्रात भारत सरकारच्या लसीकरण मोहिमेच्या पाठीशी साडेतीन लाख सदस्य असल्याचे नमुद केले. तसेच या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धे आणि सर्वसामान्यांना लसी दिली. तसेच आरोग्य मंत्रालयाच्या सुचनेनुसार कोरोनाबाधितांची ओळख पटवून त्यांना ट्रेस करत उपचार केले जात आहे. मात्र सर्वाधिक नागरिक अद्याप मास्क न घालता गर्दी जमा करतात यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन करतात. कोरोना विषाणूमध्ये बदल होत संसर्ग वाढतो आणि आरोग्य सेवाकांची मेहनत निष्फळ ठरतेय. यामुळे देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरतेय असे स्पष्ट केले.
सध्या कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई, मोठ्या प्रमाणात बेड्स आणि ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांना धीर देत उत्साह वाढवणे, तसेच नियमानुसार कोरोनावर उपचार घेणे सध्या गरजेचे असल्याचे या पत्रात म्हटले आहे. दरम्यान जिल्हा स्तरावर कोरोना लसीकरण टास्क फोर्स टीम तयार करुन यात खासगी, सरकारी व्यक्तींची मदत घेत तळागाळातील व्यक्तींपर्यंत लस पोहचली पाहिजे अशी व्यवस्था उभारा, यासाठी असोसिएशन आणि त्यामधील सदस्य काम करण्यास तयार आहेत असे ही पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
तसेच सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांसाठी लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केले पाहिजे. तसेच राशन आणि इतर सरकारी सुविधांचा लाभ घेण्याआधी लसीकरण प्रमाणपत्र असे तरच सुविधा देण्याचा नियम तयार केला पाहिजे अशी मागणी असोसिएशनने केली आहे. दरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या चित्रपट, सांस्कृतिक आणि धार्मिक तसेच क्रीडा या क्षेत्रातील कार्यक्रमांवर तात्पुरती बंदी घालावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन या पत्रात केली आहे.