कोळसाच्या अपुऱ्या साठ्यामुळे देशभरात सध्या वीजपुरवठ्याचे संकट घोंगावतंय. वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांना वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर आता रेल्वे प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशामध्ये वीज निर्मितीसाठी कोळसा वाहतूक सुलभ व्हावी म्हणून काही प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
कोळशाच्या गाड्या जलद गतीनं चालवता येतील जेणेकरुन वीजेची निर्मिती करण्यात अडथळा येऊ नये म्हणून काही प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत. सध्या भारतातील बर्याच भागांमध्ये दीर्घकाळ वीज जात आहे. यासंदर्भात “वीजनिर्मिती वेगाने व्हावी या उद्देशाने हा तात्पुरता उपाय केला आहे. परिस्थिती सामान्य होताच प्रवासी सेवा पूर्ववत केल्या जातील. कोळसा पॉवर प्लांटमध्ये नेण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे”, असे भारतीय रेल्वेचे कार्यकारी संचालक गौरव कृष्ण बन्सल यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, कोळशाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे आपल्या ताफ्यात आणखी 100,000 वॅगन्स जोडण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, मालाची जलद वितरण करण्यासाठी ते समर्पित फ्रेट कॉरिडॉर देखील निर्माण केला जात असल्याची माहिती आहे.
सध्या देशात मोठ्या प्रमाणावर कोळशाचा मोठा तुटवडा भासत आहे. दरम्यान, वीज केंद्रांमध्ये कोळशाचा तुटवडा लक्षात घेता रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. रेल्वेने कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाड्यांना प्रवासी गाड्यांच्या आधी ग्रीन सिग्नल देण्याचे निर्देश देखील दिले आहेत.
या प्रवाशी गाड्या काही काळासाठी रद्द
- लखनौ-मेरठ एक्सप्रेस (22453)
- प्रयागराज संगम-बरेली एक्सप्रेस(14307)
- बरेली-प्रयागराज संगम एक्सप्रेस(14308)
- रोजा-बरेली एक्सप्रेस (04379)
- मुरादाबाद-काठगोदाम एक्सप्रेस (05332)
- मेरठ-लखनऊ एक्सप्रेस (22454)
- बरेली-रोजा एक्सप्रेस (04380)
- शामिल- काठगोदाम-मुरादाबाद एक्सप्रेस(05331)
हेही वाचा – बिहारमध्ये पुढील 48 तासांत पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज