भारतीय रेल्वे ही आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि जगातील चौथ्या क्रमाकांचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. मीडिया रिपोर्टनुसार, देशात एकूण 12,167 पॅसेंजर ट्रेन्स आहेत. याशिवाय भारतात 7,349 मालगाड्या आहेत. दररोज या भारतीय रेल्वेतून ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्ये इतके, म्हणजे 2 कोटी 3 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यातील प्रत्येक ट्रेनचे भाडे वेगवेगळ्या श्रेणीनुसार आहे. यात काही अशा गाड्या आहेत ज्यात प्रवास करण्यासाठी खूप भाडे मोजावे लागते. पण तुम्हाला माहित आहे का की, अशी एक ट्रेन आहे ज्यामध्ये तुम्ही मोफत प्रवास करू शकता. नेमकी ही ट्रेन कुठे आणि कसा प्रवास आहे जाणून घेऊ…
ही ट्रेन हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सीमेवर धावते. जर तुम्ही भाक्रा नागल धरण बघायला गेलात तर तुम्ही या ट्रेन प्रवासाचा मोफत आनंद घेऊ शकता. वास्तविक ही रेल्वे नागल ते भाक्रा धरणापर्यंत धावते. गेल्या 73 वर्षांपासून या ट्रेनमधून 25 गावांतील लोक मोफत प्रवास करत आहेत. तुम्ही विचार करत असाल की एकीकडे देशातील सर्व ट्रेनचे तिकीट दर वाढवले जात असताना दुसरीकडे लोक या ट्रेनमध्ये मोफत प्रवास का करतात आणि रेल्वे त्याला परवानगी कशी देते?
वास्तविक ही ट्रेन भगरा धरणाची माहिती देण्याच्या उद्देशाने चालवली जाते. जेणेकरून देशातील सर्वात मोठे भाक्रा धरण कसे बांधले गेले हे देशातील भावी पिढीला कळू शकेल. हे धरण बनवताना कोणत्या अडचणी आल्या, हे त्यांना कळायला हवे. भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ ही ट्रेन चालवते. हा रेल्वेमार्ग बनवण्यासाठी डोंगर कापून दुर्गम मार्ग तयार करण्यात आला.
ही रेल्वे गेल्या73 वर्षांपासून प्रवाश्यांसाठी धावतेय, पहिल्यांदा 1949 मध्ये ही ट्रेन चालवण्यात आली. या ट्रेनमधून दररोज 25 गावातील 300 लोक प्रवास करतात. या ट्रेनचा सर्वाधिक फायदा विद्यार्थ्यांना होतो. नांगल ते धरणापर्यंत ही ट्रेन धावते आणि दिवसातून दोनदा प्रवास करते. ट्रेनची खास गोष्ट म्हणजे तिचे सर्व डबे लाकडाचे आहेत. त्यात हॉकर किंवा तुम्हाला टीटीई मिळणार नाही.
ही ट्रेन डिझेल इंजिनवर चालते. एका दिवसात 50 लिटर डिझेल लागते. या गाडीचे इंजिन सुरू झाले की, भाक्रा येथून परत आल्यानंतरच ती थांबते. या ट्रेनमधून भाक्रा येथील बरमाळा, ओलिंडा, नेहला भाकरा, हंडोळा, स्वामीपूर, खेडा बाग, कलाकुंड, नांगल, सालंगडी आदी परिसरातील गावांतील लोक प्रवास करतात.
ही ट्रेन नांगलहून सकाळी 7:05 वाजता निघते आणि भाक्राहून सकाळी 8:20 वाजता नांगलला परत येते. त्याच वेळी, पुन्हा एकदा दुपारी 3:05 वाजता नांगल येथून धावते आणि संध्याकाळी 4:20 वाजता भाक्रा धरणातून नांगलला परत येते. नांगलहून भाक्रा धरणापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रेनला 40 मिनिटे लागतात. सुरुवाताला या ट्रेनसा 10 डबे होते, पण आता फक्त 3 डब्ब्यांची ही ट्रेन सुरु आहे. या ट्रेनमध्ये एक डबा पर्यटकांसाठी आणि एक महिलांसाठी राखीव आहे.