मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांनी राज्यघटनेबाबत लिहिलेल्या लेखावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. जनता दल युनायटेड आणि राष्ट्रीय जनता दलाने या लेखावरून याआधीच भाजपावर हल्लाबोल केला आहे. आता यात राष्ट्रवादी काँग्रेस देखील उतरली आहे. या मागे काही भलतासलता हेतू तर नाही ना? अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केली आहे.
हेही वाचा – “सत्तेसाठी निष्ठा विकून खाल्ली…” दिलीप वळसे-पाटील यांच्या वक्तव्याचा जितेंद्र आव्हाडांनी घेतला समाचार
विवेक देबराय यांनी ‘दी मिंट’मध्ये एक लेख लिहिला आहे. राज्यघटनेत काही दुरुस्त्या करून भागणार नाही. आपल्याला ‘ड्रॉइंग बोर्ड’वर परत जावे लागेल आणि पहिल्या सिद्धांतापासून सुरुवात करावी लागेल. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य आणि समानता याची आजच्या घडीला काय व्याख्या आहे, हे जाणून घ्यावे लागेल. आपण स्वत:लाच एक नवी राज्य घटना द्यावी लागेल, असे त्यांनी या लेखात म्हटले आहे.
मान.पंतप्रधान यांचे आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लिहिलेल्या लेखात म्हटलंय की “भारतीय राज्यघटना बदलली पाहिजे..”
एवढ्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीच्या मनात हा विचार आलाच कसा?
लिखित घटनेचं वय १७ वर्ष असते असा अजब…— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 21, 2023
आपली सध्याची राज्यघटना मुख्यत्वे 1935च्या भारत सरकारच्या कायद्यावर आधारित आहे. 2002 मध्ये घटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाचा अहवाल आला होता, पण तो पूर्ण प्रयत्न नव्हता. कायद्यातील सुधारणांच्या इतर अनेक पैलूंप्रमाणे, येथे इतर बदल करून चालणार नाही, असेही या लेखात नमूद करण्यात आले आहे.
जदयू आणि राजदची टीका
विवेक देबरॉय यांच्या लेखातून भाजप आणि आरएसएसची घृणास्पद विचारसरणी पुन्हा उघड झाली आहे. भारत असे प्रयत्न कधीही स्वीकारणार नाही. देबरॉय कधीही आर्थिक धोरणांवर आपले मत व्यक्त करू शकत नाहीत, परंतु ज्याची त्यांना माहिती नसते, अशा इतर क्षेत्रांबाबत मात्र चर्चा करतात, अशी टीका जेडीयूचे राष्ट्रीय सचिव राजीव रंजन यांनी केली आहे.
राष्ट्रीय जनता दल नेते आणि राज्यसभा खासदार मनोज झा म्हणाले की, हे विवेक देबरॉय यांचा बोलविता धनी वेगळा आहे. साचलेल्या पाण्यात खडे टाका आणि तरंग निर्माण होत असतील तर आणखी खडे टाका. त्यातून असे दाखवा की, ही मागणी जोर धरू लागली आहे. भाजपाचा हाच प्रयत्न यामागे आहे.
हेही वाचा – “चुकीचं बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही” दिलीप वळसे-पाटलांचे ‘त्या’ वक्तव्यावर घुमजाव
राष्ट्रवादी काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदी यांचे आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की “भारतीय राज्यघटना बदलली पाहिजे..” एवढ्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीच्या मनात हा विचार आलाच कसा? लिखित घटनेचं वय वर्ष असते असा अजब तर्क त्यांनी मांडला. घटनेचा मूळ गाभा असलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समानता, लोकशाही यांना विरोध का करत असावेत, अशी मंडळी? काही भलतासलता हेतू तर नाही ना या मागे? अशी शंका माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. तुम्ही किती बी करा रे हल्ला, लय मजबूत आहे आमच्या भीमाने लिहिलेला संविधानाचा किल्ला…, असेही त्यांनी सुनावले आहे.