नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटातही आयटी कंपन्या भारताच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करत आहेत. सध्याच्या आर्थिक वर्षात 55 हजारांहून अधिक नोकऱ्या निर्माण होणार आहेत, असंही देशातील प्रमुख सॉफ्टवेअर कंपनी Infosys ने सांगितलेय.
इन्फोसिस देणार 55 हजार नोकऱ्या
आयटी सेक्टरमधील प्रमुख कंपनी इन्फोसिसचे चीफ फायनान्शिअल ऑफिसर नीलांजन रॉय म्हणाले, कंपनीचा टॅलेंट पूल वाढवणे आणि त्यात सुधारणा करणे याला कंपनीचे प्राधान्य राहील. तिच्या ग्लोबल हायरिंग प्रोग्राम अंतर्गत कंपनी 2021-2022 या आर्थिक वर्षात 55,000 हून अधिक भरती करणार आहे.
आयटी कंपन्या नफ्यात
TCS, Infosys आणि Wipro सारख्या मोठ्या कंपन्यांनी बुधवारी त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले. या तिन्ही कंपन्यांना ऑक्टोबर-डिसेंबर 2021 मध्ये प्रचंड नफा झाला. इन्फोसिसचा निव्वळ नफा 2020-21 या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 5,197 कोटी रुपये होता, जो आता 5809 कोटी रुपये झाला. त्याचप्रमाणे TCS ने या कालावधीत 9,769 कोटी रुपये आणि विप्रो 2,970 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला.
महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढली
Infosys ने माहिती दिली की, डिसेंबर 2020 पर्यंत कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 2,49,312 होती, जी डिसेंबर 2021 मध्ये वाढून 2,92,067 झाली. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 39.6% महिला कर्मचारी आहेत. त्याचप्रमाणे टीसीएसने सांगितले की, त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 5,56,986 झालीय. यात महिला कर्मचाऱ्यांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेलीय. त्याच वेळी विप्रोचे एकूण कर्मचारी 2,31,671 वर गेलेत. या तिमाहीत 41,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलीय. TCS ने आपल्या भागधारकांसाठी प्रति शेअर 7 रुपये आणि विप्रोने प्रति शेअर 1 रुपये लाभांश जाहीर केलाय.
हेही वाचा : Covid peak in India : भारतातून कोरोनाची तिसरी लाट कधी संपणार? अमेरिकन तज्ज्ञ म्हणतात…