चीनकडून घेतलेले कर्ज फेडणे आता आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानकडून शक्य होईल असे वाटत नाही. कर्जावरील व्याजाचा हा डोलारा दिवसेंदिवस वाढत असल्याने पाकिस्तान सरकारवरील चीनचा दबावही वाढत चालला आहे. त्यातूनच या कर्जातून सुटका करून घेण्यासाठी आता पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मिरातील गिलगिट-बाल्टिस्तानचा भाग चीनला सुपूर्द करण्याची तयारी सुरू केल्याचे म्हटले जात आहे. तसे झाल्यास भारत-पाक संबंधांत मोठा तणाव निर्माण होऊन युद्ध भडकू शकते.
दक्षिण आशियातील स्थान बळकट करण्याची संधी चीन शोधत आहे. चीन-पाक आर्थिक कॉरिडोर (सीपीइसी) पाकव्याप्त काश्मिरातून जातो. त्यामुळे या भागावर चीनची विशेष नजर आहे. त्यामुळे कर्जाच्या माध्यमातून हा भाग आपल्या ताब्यात यावा यासाठी चीनकडून पाकिस्तानवर दबाव वाढवला जात आहे. याच दबावातून चीनला गिलगिट-बाल्टिस्तानचा भाग मिळाल्यास येथे चीनला अधिकृत सैन्यतळ उभारता येईल. तसे झाल्यास पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठी भारताला पाकिस्तानसोबतच चीनसोबतही लढावे लागेल.
चीन-पाक आर्थिक कॉरिडोरवर येथील स्थानिक नागरिक नाराज आहेत. हा भाग चीनला सुपूर्द करण्यात आल्यास येथील जनता त्याविरोधात मोठे बंड करण्याची शक्यता आहे. चीनने गिलगिट-बाल्टिस्तान गिळंकृत केल्यास अमेरिकेलादेखील हे परवडणारे नाही. त्यामुळे अमेरिकेकडूनही पाकिस्तानवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे.