राज्यसभेत सभापती जगदीप धनखड आणि काँग्रेसचे अध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गे आमने-सामने आले आहेत. हा वाद एवढा वाढला की शेवटी सभापती धनखड यांनी सोमवारपर्यंत राज्यसभा स्थगित केली आहे. शेतकरी पुत्र आणि कामगाराचा पुत्र यावरून धनखड आणि खर्गेंमध्ये बाचाबाची झाली.
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधी पक्षानं अविश्वास ठराव आणला आहे. पण, हा प्रस्ताव पक्षपाती असल्याचा आरोप धनखड यांनी केला आहे.
हेही वाचा : शरद पवारांच्या बड्या नेत्याची केंद्रीय मंत्र्यासोबत अदानींच्या घरी बैठक, मोठा भूकंप होणार?
नेमकं घडलं काय?
माझ्याविरोधात जो अविश्वास प्रस्ताव आणला आहे. तो 14 दिवसांनी पटलावर ठेवण्यात येईल, असं धनखड यांनी सांगितलं. त्यानंतर विरोधी पक्षाचे उपनेते, प्रमोद तिवारी यांनी धनखड यांना काही कायदेशीर सल्ले दिले.
यावर धनखड यांनी म्हटलं, “प्रमोत तिवारी यांनी लक्षात ठेवावं की, 24 तास तुम्हाला हेच काम आहे. तुम्ही माझ्याविरोधात काय-काय बोलता, हे मी ऐकत आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी माझी कमकुवत बाजू दाखवणार नाही. देशासाठी जीवही देण्यास मी तयार आहे.”
“मी सगळ्यांना सन्मान देण्यास कुणालाही कमी केली नाही. पण, मी खूप सहन केले. आज शेतकरी फक्त शेतीपुरता मर्यादित नाही. सरकारी नोकरी, उद्योग सगळीकडे शेतकरी काम करत आहे. अविश्वास प्रस्ताव आणण्याचा तुमचा अधिकार आहे,” असं धनखड यांनी म्हटलं.
यानंतर संतापलेले मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा असाल, तर मीही कामगाराचा मुलगा आहे. तुम्ही नियमानं राज्यसभा चालवा. तुम्ही सत्तेतील खासदारांना बोलण्याची संधी देता. ते नियम तोडून बोलत असतात. मात्र, आम्हाला सन्मान देत नाही. मग आम्ही तुम्हाला कशाला सन्मान देऊ?”
हेही वाचा : ‘NCP’चे खासदार अन् आमदार फुटणार? जयंत पाटील संतापले अन् महायुतीला झोडपलं; म्हणाले, “महाराष्ट्रात…”