जम्मू -काश्मीरमधील शोपियानमधील कांजिलूर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे.
या चकमकीत लष्कर-ए-तोय्यबा या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले. समोर आलेल्या माहितीनुसार, आयजीपी काश्मीर यांनी सांगितले की, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख शोपियान येथील जान मोहम्मद लोन अशी झाली आहे. अलीकडेच कुलगाम जिल्ह्यात २ जून रोजी बँक मॅनेजर विजय कुमार यांची हत्या झाली. या हत्येत या दहशतवाद्याचा सहभाग होता. मात्र दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटवली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वर्षात सुरक्षा दलांनी 102 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
J-K: Terrorist who shot dead Bank manager from Kulgam, killed in Shopian encounter
Read @ANI Story | https://t.co/oADkpzfaUF#JammuAndKashmir #bankmanagershotinkulgam #Terrorists pic.twitter.com/KZm1tjqGtY
— ANI Digital (@ani_digital) June 15, 2022
मारल्या गेलेल्या या दहशतवाद्यांची संख्या सर्वात मोठी आहे. त्याचवेळी ठार झालेल्या या दहशतवाद्यांपैकी 73 स्थानिक असून 29 पाकिस्तानी दहशतवादी सामील आहेत. त्याचवेळी जूनच्या 14 दिवसांत सुरक्षा दलाने 11 दहशतवाद्यांचा खात्मा केला. या वर्षी मे महिन्यात सर्वाधिक 27 दहशतवादी मारले गेले आणि फेब्रुवारीमध्ये सर्वात कमी 7 दहशतवादी मारले गेले. मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर पोलिसांना मोठे यश मिळाले होते. जम्मू-काश्मीर पोलिसांनी लष्कर-ए-तोय्यबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र या चकमकीत एक पोलीसही जखमी झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी बेमिना परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर नाकाबंदीची कारवाई केली.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात हिंदूंना टार्गेट करत हत्येच्या घटना घडल्या. काही दिवसांपूर्वी अतिरेक्यांनी कुलगाम येथील एका बँक मॅनेजरची हत्या केली, विजय कुमार असं या बँक मॅनेजरचं नाव असून ते राजस्थान येथे राहणारे होते. मूळचे राजस्थानचे असलेले विजय कुमार हे कुलगाम येथील मोहनपोरा येथील देहात बँकमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत होते. मात्र दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांच्या मृत्यू झाला. तर १२ मे रोजी काश्मीर येथील बडगाम जिल्ह्याच्या चदूरा परिसरात काश्मीर पंडित राहुल भट याचीही हत्या करण्यात आली.
१८ मे रोजी आतंकवाद्यांनी उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला येथील एका दारूच्या दुकानात प्रवेश करत ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात जम्मूमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले. २४ मे रोजी सैफुल्ला कादरी या पोलिसावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर दोनच दिवसांनी कलाकार अमरीन भट याच्यावरही गोळीबार करण्यात आला. या घटनांमुळे काश्मीर खोरे हादरले आहे. यामुळे काश्मीर खोऱ्यात हिंदू नागरिकांची सुरक्षा धोक्यात आल्याने पोलीस यंत्रणा आणि सरकार यांच्यापुढील आव्हाने वाढली आहेत.