जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसला मंगळवारी मोठी धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या जाण्यानंतर एकीकडे पक्ष डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे पक्षातून नेत्यांचे राजीनाम्याचे सत्र सुरु आहे. यात मंगळवारी माजी उपमुख्यमंत्री तारा चंद यांच्यासह जम्मू काश्मीरमधील 64 नेत्यांनी पक्षातून राजीनामा देण्याची घोषणा केली. तारा चंद यांच्याशिवाय माजी मंत्री अब्दुल माजीद वाणी, डॉ मनोहर लाल शर्मा, चौधरी घारू राम, माजी आमदार ठाकूर बलवान सिंह आणि माजी सरचिटणीस विनोद मिश्रा यांच्यासह ६४ नेत्यांनी काँग्रेस सोडण्याची घोषणा केली आहे. या सर्व नेत्यांनी जम्मूमध्ये पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर हे सर्व 64 नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांना पाठिंबा जाहीर केला आहे.या सर्वांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्य़ाकडे आपला अधिकृत राजीनामा सोपवला आहे. ज्यावर बलवान सिंह म्हणाले की, ‘आम्ही गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे संयुक्त राजीनामा सादर केला आहे.’
दुसरीकडे मंगळवारी काँग्रेस जम्मूमध्ये शक्तीप्रदर्शनाच्या तयारीत आहे. एआयसीसीच्या जम्मू-काश्मीर आणि लडाख प्रकरणाच्या प्रभारी रजनी पाटील आणि नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष विकार रसूल मंगळवारी जम्मूला येत आहेत. जम्मू विमानतळ ते पक्ष मुख्यालयापर्यंत रॅलीच्या रूपात दोन्ही नेत्यांचे स्वागत करून पक्षाचे डॅमेज कंट्रोल करण्याची योजना आहे.
सोमवारी माजी उपसभापती गुलाम हैदर मलिक यांच्यासह आणखी तीन काँग्रेस नेत्यांनी सोमवारी ज्येष्ठ राजकारणी गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ पक्षातून राजीनामा देण्याची घोषणा केली. कठुआच्या बानी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार हैदर मलिक, कठुआचे माजी आमदार सुभाष गुप्ता आणि दोडा येथील माजी आमदार श्याम लाल भगत यांनी आपले राजीनामे पक्ष हायकमांडकडे पाठवले आहेत. आझाद यांचे निकटवर्तीय आणि माजी मंत्री जीएम सरोरी यांनी सोमवारी सांगितले की त्यांना मलिक, गुप्ता आणि भगत यांच्या समर्थनाची पत्रे मिळाली आहेत.