पाटणा : बिहारमधील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जदयू आणि भाजपामध्ये कुरघोडीचे राजकारण रंगले आहे. भाजपाने अरुणाचल प्रदेश पाठोपाठ मणिूपरमध्ये जदयूला खिंडार पाडले आहे. त्यावरून डिवचलेल्या जदयूने तीव्र प्रतिक्रिया दिला आहे. 2024च्या निवडणुकीनंतर जुमलेबाजांपासून देश मुक्त होणार, असा पलटवरा जदयूने भाजपावर केला आहे.
गेल्या महिन्यात भाजपाची साथ सोडत जनता दल युनायटेडने राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या मदतीने बिहारमध्ये सरकार स्थापन केले. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच अरुणाचल प्रदेशमधील जदयूच्या एकमेव आमदाराने भाजपात प्रवेश केला. तेथील जदयूच्या सहा आमदार आधीच भाजपात गेले होते. त्यापाठोपाठ काल मणिूपरमधील सहापैकी पाच आमदारांनी भाजपात प्रवेश केला आणि तेथील विधानसभा अध्यक्षांनी त्याला मान्यताही दिली आहे. याबाबत बिहारमधील भाजपा नेते आणि राज्यसभा सदस्य सुशील मोदी यांनी ट्वीट केले आहे. अरुणाचल प्रदेशापाठोपाठ मणिपूरसुद्धा जदयूमुक्त झाले असून लवकरच लालूप्रसाद यादव बिहारला सुद्धा जदयूमुक्त करतील, असे त्यांनी म्हटले आहे.
अरुणांचल के बाद मणिपुर भी JDU मुक्त ।बहुत जल्द लालूजी बिहार को भी JDU मुक्त कर देंगे ।@ANI @ABPNews @News18India @News18Bihar @ZeeBiharNews
— Sushil Kumar Modi (@SushilModi) September 2, 2022
यावरून जदयू संतप्त झाले आहे. ‘अरुणचाल प्रदेश आणि मणिपूरमध्ये जदयूने भाजपाला हरवून विजय मिळविला आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जदयूपासून मुक्त करण्याचे दिवास्वप्न पाहू नका,’ असे जदयू नेता राजीव रंजन ललन सिंह यांनी सुशील मोदी यांना सुनावले आहे. ‘मणिपूरच्या निमित्ताने भाजपाचे नैतिक वर्तन पुन्हा एकदा सर्वासमोर आले आहे. 2015मध्ये पंतप्रधानांनी 42 सभा घेतल्यानंतर 53 जागांवर विजय मिळविता आला होता, हे तुम्हाला ठाऊक असेलच. 2024मध्ये जुमलेबाजांपासून देश मुक्त होईल… प्रतीक्षा करा,’ असा पलटवारही त्यांनी केला आहे.
.@SushilModi जी,
आपको स्मरण कराना चाहते हैं कि अरुणाचल और मणिपुर दोनों जगह जद (यू.) ने @BJP4India को हराकर सीटें जीती थी। इसलिए जद (यू.) से मुक्ति का दिवास्वप्न मत देखिए। अरुणाचल प्रदेश में जो हुआ था, वह आपके गठबंधन धर्म के पालन के कारण हुआ था ?
1/2— Rajiv Ranjan (Lalan) Singh (@LalanSingh_1) September 3, 2022
भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय मणिपूरमधील या आमदारांना मान्य नव्हता, असे सांगितले जाते. त्यातच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मणिपूरमध्ये भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मणिूपरमधील सहापैकी पाच जदयू आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याचे सूत्रांनी सांगितले. तथापि, जदयूने पाठिंबा काढल्यावरही मणिपूरमधील सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावा भाजपाने केला आहे. 60 सदस्य असलेल्या मणिपूर विधानसभेत भाजपाला मित्रपक्षांचे मिळून 55 आमदारांचे पाठबळ आहे, असे भाजपाने म्हटले आहे.