भारत १९४७ पूर्वी जसा होता, त्या काळात गेलाय. तरीही काही व्यक्ती आपापली दुकानं वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. देश संकटात आहे. त्याला वाचवण्यासाठी पुढाकार घेणारा पक्षच वाचेल, या शब्दांत सीपीआयमधून बाहेर पडलेल्या कन्हैया कुमार यांनी विरोधकांवर टिकास्त्र सोडलं.
काँग्रेस पक्ष प्रवेशानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कन्हैया कुमार यांनी पक्ष प्रवेशामागील हेतू सांगत विरोधकांना लक्ष केलं. यावेळी काँग्रेसचे केसी वेणूगोपाल, रणदीप सिंग सुरजेवाला, भक्त चरण दास आदी मान्यवर उपस्थित होते. कन्हैया कुमार पुढे म्हणाले की, भारतीय चिंतन परंपरा वाचवण्याची गरज आहे. काँग्रेस हा सर्वात जुना पक्ष आहे. विरोधी पक्ष कमजोर झालाय, असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा सत्ता हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करते. देशाच्या लोकसभेत काँग्रेसशिवाय दुसरा विरोधी पक्ष राहिलेला नाही. या पक्षाला वाचवलं नाही तर लहान पक्षही राहणार नाहीत.
देशातील लोक म्हणजेच देशाचा विचार आहे. मात्र, काही लोक देशाची संस्कृती खराब करण्याचं काम करताहेत. आज देशाला शहीद भगतसिंग यांची वीरता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समानता आणि महात्मा गांधीजींच्या एकतेची गरज आहे. देशातील वैचारिक संघर्षाला काँग्रेस पक्षच नेतृत्व देऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं.
दिल्ली ते नागपूर सर्वदूर डावपेच – आमदार जिग्नेश
दिल्लीत रस्त्यावर संविधान जाळलं जातं. इतकं विष मनामनांत पेरलं जातंय आणि या साऱ्यासाठीचे सूत्र दिल्ली-नागपूरमधून हलवले जाताहेत. काहीही करुन या देशाच्या लोकशाहीला वाचवायचंय, अशा शब्दांत आमदार जिग्नेश यांनी दिल्ली सरकारसह भाजपवर टीका केली. आमदारकी असल्यानं लगेचच काँग्रेस पक्षप्रवेश शक्य नाही. मात्र, काँग्रेसच्या विचारांसोबत राहणं अधिक महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय पातळीवर जे होतंय ते आम्ही गुजरातमध्ये पाहिलंय. एकीकडे बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर असताना ३ हजार किलो ड्रग्ज गुजरातमध्ये उतरवले जाताहेत. या पिढीला नशेच्या वाटेवर ढकललं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.