नवी दिल्ली : कर्नाटकातील मतदान (Karnataka Assembly election) आता आठ दिवसांवर आले असताना येथील प्रचार टिपेला पोहोचला आहे. त्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. पण त्याचबरोबर भाषेचा स्तरही खालावत चालला आहे. याची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) घेतली आहे. त्यातच भाजपा (BJP) आणि काँग्रेसने (Congress) मंगळवारी निवडणूक आयोगाची भेट घेऊन एकमेकांविरोधातील आक्षेपार्ह टिपण्या आणि द्वेषयुक्त भाषणांबाबत तक्रार केली.
#KarnatakaElections2023 | Election Commission of India issues advisory to all star campaigners, recognized national & state political parties in view of “plummeting level of campaign discourse in the ongoing General Election to Karnataka Legislative Assembly”, advises them to… pic.twitter.com/Xc3ODHOgcM
— ANI (@ANI) May 2, 2023
यासंदर्भात कठोर भूमिका घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना त्यांच्या भाषेवर संयम ठेवण्याचा इशारा दिला आहे. निवडणुकीदरम्यान वादविवाह होत असले तरी, त्याची पातळी घसरू देऊ नका, अन्यथा अशा पक्षांवर व नेत्यांवर कारवाई करावी लागेल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
राजकीय पक्षांसाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. आदर्श आचारसंहितेचे पालन होत असल्याचे पाहतानाच अशा विधानांवर देखील बारीक लक्ष असल्याचे आयोगाने म्हटले आहे. विशेषत: राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक, प्रमुख नेत्यांच्या प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेऊन काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची तक्रार केली.
तर, कर्नाटक निवडणूक प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रक्षोभक भाषणे केली जात आहेत. ही भडकाऊ भाषणे असल्याची तक्रार काँग्रेसने केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. दोन्ही राजकीय पक्षांकडून तक्रारी आल्यानंतर, निवडणुकीचे वातावरण बिघडवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – …तर समान नागरी कायदा आणून काय फरक पडणार? ठाकरे गटाचा भाजपाला खोचक सवाल