बंगळुरू : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) यांनी शनिवारी शपथ घेतली. याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी, काँग्रेसला (Congress) राज्यात मिळालेल्या दणदणीत विजयानंतरही मी आनंदी नसल्याचे ते म्हणाले. बंगळुरूमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवकुमार यांनी ‘मन की बात’ सांगितली. विधानसभा निवडणुकीत आपल्याला 135 जागा मिळाल्या, पण मी खूश नाही, माझ्या किंवा सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्या घरी येऊ नका, असे ते म्हणाले.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 135 जागा जिंकत पूर्ण बहुमत मिळवणार्या काँग्रेसने सत्ता स्थापन केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शनिवारी शपथ घेतली. या दोन्ही नेत्यांसोबतच यावेळी आणखी आठ मंत्र्यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांसह विविध विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
“Not happy….”: Shivakumar on Congress majority in Karnataka, sets Lok Sabha polls as “next target”
Read @ANI Story | https://t.co/eBHnIBD8QX#Shivkumar #KarnatakaElections #Karnataka pic.twitter.com/7pthzEw5yr
— ANI Digital (@ani_digital) May 21, 2023
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या 135 जागांवर मी खूश नाही. आमचा फोकस योग्य ठिकाणी असायला हवा आणि तो म्हणजे आगामी सार्वत्रिक निवडणुका, असे शिवकुमार यांनी सांगितले. आपले पुढील टार्गेट लोकसभा निवडणूक (Lok Sabha elections of 2024) असून ती आणखी चांगल्या पद्धतीने लढवायला हवी. काँग्रेसने आतापासून प्रत्येक निवडणुकीत चांगली कामगिरी केली पाहिजे आणि आपण सर्वांनी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. ही फक्त सुरुवात आहे आणि फक्त एका विजयाने आत्मसंतुष्ट होऊ नका, असे ते म्हणाले. तत्पूर्वी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शिवकुमार यांच्यासह बंगळुरू येथील काँग्रेस प्रदेश कार्यालयात 32व्या पुण्यतिथीनिमित्त माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.
सिद्धरामय्या यांची भाजपावर टीका
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपावर सडकून टीका केली. भाजपावाले म्हणतात काँग्रेसने दहशतवादाला पाठबळ दिले. पण इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे आमचे दोन्ही दिग्गज नेते दहशतवादी हल्ल्यात मारले गेले आहेत. आजपर्यंत भाजपाचा एकही नेता दहशतवादी हलल्यात मारला गेला नाही, असे सिद्धरामय्या यांनी सुनावले.