‘मला चिन्मयानंद यांच्याकडून धोका आहे. ते माझा छळ करतात. माझ्याकडे असे पुरावे आहेत, जे चिन्मयानंद यांना अडचणीत आणू शकतील’, अशी तक्रार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना वारंवार मदतीसाठी अर्जवं करणारी तरुणी अखेर गायब झाली आहे. उत्तर प्रदेशच्या शाहजहानपूर जिल्ह्यातून ही तरूणी गायब झाली आहे. चिन्मयानंद हे भाजपचे माजी केंद्रीय मंत्री असून पक्षाचे उत्तर प्रदेशमधील नेते आहेत. दरम्यान या तरूणीच्या वडिलांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनंतर चिन्मयानंद यांच्याविरोधात बऱ्याच प्रयत्नांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तरुणी शाहजहानपूरमधल्या लॉ कॉलेजमध्ये एलएलएमचं शिक्षण घेते. क्विंटने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
२३ ऑगस्टला या तरुणीने तिच्या फेसबुक पोस्टवर सेल्फी व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये ही तरुणी चिन्मयानंदांविरोधात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच, मदतीची याचना देखील केली होती. स्वामी चिन्मयानंद तरूणीच्या कॉलेजचे प्राध्यापक असून ते अनेक तरुणींचा छळ करत असल्याची तक्रार तिने या व्हिडिओमध्ये केली होती.
काय म्हणाली ही तरूणी फेसबुकवर?
‘मी शाहजहानपूरमध्ये राहाते. एसएस कॉलेजमधून मी एलएलएम करते. इथल्या संत समुदायाचा एक मोठा नेता, ज्याने अनेक मुलींची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत, मला जीवे मारण्याची धमकी देत आहे. त्याच्या विरोधातले सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. मोदीजी आणि योगीजींना माझी विनंती आहे की त्यांनी मला मदत करावी. त्याने माझ्या कुटुंबियांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मला काय सहन करावं लागत आहे, ते फक्त मला माहिती आहे. तो एक सन्याशी आहे. शिवाय पोलीस, जिल्हा न्यायदंडाधिकारी(डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट) आणि इतर सगळे त्याच्याच बाजूने आहेत, कुणीही त्याचं काहीही वाकडं करू शकत नाही, अशी धमकी तो मला देत आहे.’
उत्तर प्रदेशमधील भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांच्याविरोधात एका तरूणीचं अपहरण करण्याचा गुन्हा दाखल. गायब तरुणीने केलेला हा शेवटचा फेसबुक व्हिडिओ, ज्यात ती तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचं गाऱ्हाणं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर मांडतेय! #MyMahanagar pic.twitter.com/8nbPEuJ4ae
— My Mahanagar (@mymahanagar) August 28, 2019
हेही वाचा – टिक टॉक व्हिडिओ बनवताना जंगलात हरवला; व्हॉट्सअॅपमुळं सापडला
‘…तर समजून जा की मी संकटात आहे’
सीएनएन न्यूज १८ने दिलेल्या वृत्तानुसार मुलीच्या आईने तिच्याशी झालेल्या शेवटच्या संवादाविषयी माहिती दिली आहे. ‘रक्षाबंधनाच्या दिवशी ती शेवटचं घरी आली होती. तेव्हा मी तिला विचारलं की तिचा फोन वारंवार बंद का असतो? तेव्हा तिने सांगितलं की जर माझा फोन खूप वेळ बंद राहिला, तर समजून जा की मी संकटाच आहे. कारण तो तेव्हाच बंद राहील, जेव्हा तो माझ्याकडे नसेल. तिला फार त्रास सहन करावा लागत आहे हे मला कळत होतं’, अशी प्रतिक्रिया तरूणीच्या आईने दिली आहे.
CCTV फूटेजचा शोध सुरू
दरम्यान, या आधारावर तरूणीच्या वडिलांनी चिन्मयानंद यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच, तक्रार बदलून अपहरणाऐवजी बेपत्ताची तक्रार द्यावी यासाठी पोलीस दबाव टाकत होते, असा दावा तरुणीच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ फेसबुकवर टाकल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून ही तरूणी बेपत्ता झाली आहे. मुलीचे वडील कॉलेजच्या परिसरातल्या सीसीटीव्ही फूटेजचा यासंदर्भात सध्या शोध घेत आहेत.