उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. देशामध्ये आपल्या न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून मारलं जातंय. त्यामुळे देशातल्या आणि जगभरातल्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आजही सरकारकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत भूमिका, भावना, संवेदना व्यक्त का झाल्या नाहीत, असा सवाल देखील राऊत यांनी केला.
पवारांनी केलेलं वर्णन योग्य
राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेची तुलना जालियनवाला बाग घटनेशी केली, ही तुलना योग्यच आहे, असं संजय राऊत म्हणाले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं शिष्टमंडळ लखीमपूर खेरीला जाणार आहे. नाही अडवलं जाईल, असं संजय राऊत म्हणाले. राहुल गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी नोटिस बजावली असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
देशामध्ये नव्या प्रकारली गुलामगिरी सुरु
लोकशाहीसंदर्भात आवाज जो उठवतो, त्याची नाकेबंदी केली जाते, देशद्रोही ठरविले जाते, अशा प्रकारचा अवलंब होत असेल तर देशामध्ये नव्या प्रकारली गुलामगिरी सुरु झाली, अशी खरमरीत टीका राऊत यांनी भाजपवर केली. लखीमपूरची घटना म्हणजे आणीबाणी पेक्षा भयानक आहे. मोदींना गांधी घराण्याची भिती वाटतेय. म्हणून प्रियांका गांधींना अडवलं जातंय. योगींनी राजीनामा द्यायला पाहीजे. मोदी देशाचा अमृत महोत्सव साजरा करायला लखनौला जातात पण अमृत महोत्सव रक्तानं माखला आहे, असंही राऊत म्हणाले.
हेही वाचा – यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही; संजय राऊतांची माहिती