उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने चार शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यावरुन उत्तर प्रदेशसह देशातील राजकारण तापलं आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत खीमपूर खेरी दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तसंच, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला.
उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन संपवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी आता आक्रमक वृत्ती स्वीकारली आहे. शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी सचिन पायलट यांनी केली. भाजप शासित राज्यांमध्ये शेतकऱ्यांवर आक्रमण होत आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी लोकांना भडकवण्याचं काम केलं. काठ्या हातात घ्या आणि शेतकऱ्यांना धडा शिकवा, असं वक्तव्य करत लोकांना भडकवण्याचं काम त्यांनी केलं, अशी टीका पायलट यांनी केली.
प्रियंका गांधींसोबत गौरवर्तन केल्याचा आरोप
प्रियंका गांधी जेव्हा लखीमपूर येथे मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होत्या. मात्र, प्रियंका गांधी यांना रोखण्यात आलं. त्यांच्या सोबत गैरवर्तन करण्यात आलं. यूपी पोलीस आणि प्रशासनाने केलेल्या वागणुकीचा निषेध करतो, असं पाटलट म्हणाले.
गेल्या एक वर्षापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. भाजपने यातून धडा घ्यायला हवा. भाजप सरकार प्रियंका गांधींना घाबरत आहे. म्हणूनच ते त्यांना अशी वागणूक देत आहेत. काँग्रेसने शेतकऱ्यांसोबत कधीही राजकारण केल नाही. उलट, काँग्रेस पक्ष नेहमी पूर्ण शक्तीने त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. उत्तर प्रदेश सरकार कोणत्याही कायद्याचे पालन करत नाही, अशी टीका पायलट यांनी केली.