लखीमपूर खिरी : मागील महिन्यापासून उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणातील अनेक घडामोडी समोर येत आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. आशिष मिश्राने शेतकरी आंदोलकांवर गाडी चालवल्यानंतर चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही आंदोलकांनी त्यांचा गाडीचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला होता. परंतु मिश्राने गाडीतून खाली उतरत आंदोलकांवर रायफलच्या सहाय्याने गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर रोजी लखीमपूर खिरी येथील तिकुनिया परिसरामध्ये शेतकरी आंदोलकांवर गाडी चालवल्यानंतर चार ते आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपानुसार, केंद्रीय गृह राज्यमंत्री यांचा मुलगा आशिष मिश्रा या आरोपीने शांतीपूर्ण सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांवर गाडी चढवत त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
९ ऑक्टोबर रोजी आशिष मिश्रा आणि त्याचे साथीदार अंकित दासकडून लायसन्स असलेली रायफल, पिस्तुल, रिव्हॉल्व्हर आणि रिपीटर गन ताब्यात घेण्यात आली होती. या आरोपींना १५ ऑक्टोबरला विज्ञान प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठवण्यात आलं होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, चार आरोपींची रायफल गनविषयी फॉरेन्सिक तपासणी केल्यानंतर आशिष मिश्राच्या रायफलसह तीन आरोपींकडून गोळी चालवण्यात आली होती. परंतु गोळ्या कोणत्या वेळी झाडण्यात आल्या याबाबत माहिती अद्यापही अस्पष्ट आहे. ताब्यात घेण्यात आलेली रायफल ही आशिष मिश्राची होती. पिस्तुल अंकित दास आणि रिपीटर गन ही आशिष मिश्राचा सुरक्षा रक्षक लतीफची होती. या तिघांकडून शेतकऱ्यांवर गोळी झाडण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. विशेष टीमकडून या हत्येप्रकरणी चौकशी केली जात आहे. ३ ऑक्टोबर रोजी तिकुनिया परिसरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी जगजीत सिंह यांच्याद्वारे आरोप करण्यात आलाय की, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने या संपूर्ण प्रकरणात कट रचल्याचा परिणाम असल्याचं सिंह यांनी सांगितलं आहे.
लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणाची पार्श्वभूमी काय?
३ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी जिल्ह्यातील तिकुनियामध्ये एका कारने शेतकऱ्यांना चिरडले होते. यामध्ये ४ ते ८ शेतकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. यानंतर संपूर्ण देशात हे प्रकरण उफाळून निघाले होते. अनेक जणांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. या प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्राला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय कोणता मोठा निर्णय घेणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.