बुधवारी मणिपूर राज्यातील चुरचंदपूर जिल्ह्यात असलेल्या तोरबांग येथे ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियनने ‘आदिवासी एकता मोर्चा’ काढला होता. यानंतर या मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये आग धूमसताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील दिसताक्षणी गोळ्या घालण्यांचे आदेश दिले आहेत. राज्यातील हिंसाचार वाढत असल्याने या ठिकाणचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेले आहे.
वाढत्या हिंसाचारामुळे मणिपूर राज्यात जाणाऱ्या ट्रेन थांबविण्यात आलेल्या आहेत. परिस्थिती नीट होईपर्यंत कोणतीही ट्रेन मणिपूरमध्ये प्रवेश करणार नाही. मणिपूर सरकारने रेल्वे वाहतूक थांबवण्याचा सल्ला दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती एनएफ रेल्वेचे सीपीआरओ सब्यसाची डे यांच्याकडून प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे.
मणिपूर राज्यात सतत वाढत चाललेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मोबाईल इंटरनेटनंतर आता ब्रॉडबँड सेवाही बंद करण्यात आली आहे. हिंसाचार आणि अफवा आणखी पसरू नये, यासाठी सरकारने रिलायन्स जिओ फायबर, एअरटेल एक्स्ट्रीम, बीएसएनएल इत्यादींच्या ब्रॉडबँड आणि डेटा सेवा काही काळासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मणिपूर राज्यातील सध्याच्या परिस्थितीमुळे पुढील 5 दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. MHAचे उच्च अधिकारी राज्याच्या सतत संपर्कात आहेत आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा – Manipur Violence : ‘दिसताक्षणी गोळ्या घाला..’, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी का दिले असे आदेश?
मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल माहिती देताना लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आतापर्यंत हिंसाचारग्रस्त चुरचंदपूरमधील सुमारे 5 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, तर 2 हजार लोकांना इम्फाळ खोऱ्यात आणि 2 हजार लोकांना तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह या सीमावर्ती शहरात सुरक्षेच्या कारणास्तव पाठवण्यात आले आहे. तसेच, बुधवारी रात्री लष्कर आणि आसाम रायफल्सला पाचारण करण्यात आले आणि त्यांनी पोलिसांसह सकाळपर्यंत हिंसाचार नियंत्रणात आणला. गैर-आदिवासी बहुल इम्फाळ पश्चिम, काकचिंग, थौबल, जिरीबाम आणि बिष्णुपूर जिल्ह्यांमध्ये आणि आदिवासीबहुल चुरचंदपूर, कांगपोकपी आणि टेंगनौपाल जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
SpearCorps.IndianArmy ने ट्विट माहिती दिली आहे की, आसाम रायफल्सच्या पोस्टवरील हल्ल्याच्या व्हिडिओसह मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीबाबतचे नकली व्हिडिओ काही लोक त्यांच्या स्वार्थासाठी प्रसारित करत आहेत. त्यामुळे केवळ अधिकृत आणि सत्यापित स्त्रोतांद्वारे उपलब्ध असलेल्या माहितीवर अवलंबून राहण्याची विनंती या ट्वीटच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
#Manipur Update
Fake Videos on security situation in Manipur including a video of attack on Assam Rifles post is being circulated by inimical elements for vested interests. #IndianArmy requests all to rely on content through official & verified sources only@adgpi@easterncomd pic.twitter.com/Y58eROsZRM— SpearCorps.IndianArmy (@Spearcorps) May 4, 2023
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे घाबरून अनेक कुटुंबांनी आसाममध्ये आश्रय घेतला आहे. मी कचार जिल्हा प्रशासनाला या कुटुंबांची काळजी घेण्याची विनंती केली आहे. मी मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या सतत संपर्कात आहे आणि या संकटाच्या वेळी आसाम सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन देत असल्याचे आसाम राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले आहे.