२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला आशा आहे. ही निवडणूक मोदी विरुद्ध भारत असेल, अशी घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. ममता बॅनर्जी या पाच दिवसाच्या दिल्ली दौर्यावर आहेत. बुधवारी त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह दिल्लीत काही विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
राजकारणात समीकरणे बदलत असतात. आता विरोधकांना एकत्र येणे गरजेचे आहे. २०२४ च्या निवडणुकीत आम्हाला आशा आहे. पुढची निवडणूक मोदी विरुद्ध भारत असेल, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा असणार का?, हा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी काही राजकीय भविष्यवक्ता नाही. ते तेव्हाच्या स्थितीवर अवलंबून आहे.
सोनिया गांधी यांच्यासोबत पेगॅसस आणि कोरोना स्थितीवर चर्चा झाली, असे ममता बॅनर्जी यांनी बैठकीनंतर सांगितले. पेगॅससची चर्चा संसदेत नाही तर चाय पर होणार का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. १० जनपथ मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी जवळपास तासभर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधीही तेथे उपस्थित होते. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर ममता बॅनर्जी यांचा पहिला दिल्ली दौरा आहे.
विरोधी पक्षांच्या बैठकीला मात्र गैरहजर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला मात्र ममता बॅनर्जी उपस्थित राहिल्या नाहीत. इतकेच नव्हेतर तृणमूल काँग्रेसचा एकही प्रतिनिधी या बैठकीला नव्हता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.