मुंबई : पाच राज्यांमधील मतदान पार पडले आणि मोदी सरकारने तोपर्यंत झाकून ठेवलेली दरवाढीची कुऱ्हाड बाहेर काढली. राजस्थान, मध्य प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा गुरुवारी संपला. तेलंगणा राज्यातील मतदान संध्याकाळी संपले, पाचही राज्यांचे ‘एक्झिट पोल’ समोर आले आणि एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढविण्यात आल्या. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तोंडावर दरकपातीचा गाजावाजा करायचा आणि मतदान आटोपताच दरवाढ करायची. आवळा देऊन कोहळा काढण्याची मोदी सरकारची ही नेहमीची हातचलाखी आहे, असे टीकास्त्र ठाकरे गटाने सोडले आहे.
राज्याराज्यांच्या विधानसभा निवडणुका असोत की लोकसभेच्या, प्रत्येक वेळी निवडणुकीपूर्वी ‘गॅस सिलिंडर स्वस्त’, ‘पेट्रोल-डिझेलचे दर कमी’, अशा बातम्या हमखास येतात. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हणजे 16 नोव्हेंबर रोजी एलपीजीच्या किमती सरकारने तब्बल 50 रुपयांनी कमी करून सामान्यांना दिलासा वगैरे देण्याचे नाटक केले होते. अर्थात हा फसवाफसवीचा खेळ जनतेच्याही लक्षात आला आहे. तरीही त्याचा परिणाम कुठे ना कुठे, काही ना काही प्रमाणात होईल, या भरवशावर सध्याचे राज्यकर्ते असतात. त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीपूर्वी प्रामुख्याने गॅस आणि इंधन दरकपातीचा ‘प्रयोग’ मोठी जाहिरातबाजी करून लावला जातो आणि मतदानानंतर त्यावर पडदा टाकून दरवाढीचा फणा बाहेर काढला जातो, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.
गॅसची दरवाढ असो की इंधनाची, मोदी सरकारचे बोट एकतर जागतिक बाजारपेठेकडे असते, नाहीतर तेल वितरण कंपन्यांकडे. दर कमी केले तर मोदी सरकारने आणि दरवाढ केली तर तेल कंपन्यांनी किंवा जागतिक बाजारातील घडामोडींनी असा या सरकारचा नेहमीचा कांगावा असतो, अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.
हेही वाचा – Mla Disqualification : एकनाथ शिंदेंच्या ई-मेलवरून खडाजंगी; दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद
आता तर सरकारला 1 तारखेचे आणखी एक कारण सापडले आहे. कारण दर महिन्याच्या एक तारखेला एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर होत असतात. मोदी सरकार एक बोट आता त्याकडेही दाखवेल आणि मतदान संपल्याचा गॅस दरवाढीशी काही संबंध नाही, अशी मखलाशी करेल. शिवाय ही दरवाढ फक्त व्यावसायिक गॅस सिलिंडरचीच आहे, घरगुती गॅसचे भाव आम्ही वाढविलेले नाहीत, असा मानभावीपणाही सत्ताधारी करीत आहेत, असे या अग्रलेखात म्हटले आहे.
घरगुती गॅसच्या किमती जैसे थे असल्या तरी व्यावसायिक गॅस दरवाढीचा परिणाम महागाई वाढण्यात होणार आणि त्याचा फटका शेवटी सामान्य जनतेलाच बसणार. तुम्हाला सामान्य जनतेची एवढीच काळजी असेल तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती न वाढवता घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त करायला हवे होते. मात्र तसे न करता व्यावसायिक गॅसच्या दरवाढीची बनवाबनवी करण्यात आली, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
हेही वाचा – BMC : मैदाने, क्रीडांगणे दत्तक तत्त्वावर देण्याचे धोरण; काँग्रेस, भाजपच्या विरोधावरून बैठकीत गदारोळ
गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किमतीबाबत मोदी सरकार नेहमीच धूळफेक करीत असते. आताही पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी व्यावसायिक गॅसच्या दरकपातीची धूळ सरकारने जनतेच्या डोळ्यात फेकली आणि मतदान आटोपताच दरवाढ करून आपले ‘खायचे दात’ पुन्हा एकदा दाखविले. अर्थात, जनता आता तुमच्या या बनवाबनवीला फसणार नाही. 2024च्या निवडणुकीत जनता तुमचे दात तुमच्याच घशात घातल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही ठाकरे गटाने केला आहे.
हेही वाचा – पालघरमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर ठाकरेंचे आव्हान!