लखनऊ : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये यंदाच्या वर्षीचा कुंभमेळा होणार आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या काळात कुंभमेळा होणार आहे. दर तीन वर्षांनंतर एकदा अशा पद्धतीने 12 वर्षांत प्रयागराज, उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री कुंभमेळा भरत असतो. यंदाच्या वेळी हा कुंभमेळा प्रयागराज येथे होणार आहे. या कुंभमेळ्यामध्ये Apple चे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स सहभागी होणार असल्याची माहिची समोर आली आहे. साधारणतः दोन आठवडे पॉवेल या कुंभमेळ्यात तपश्चर्या करणार आहे. (Mahakumbh 2025 Apple co-founder Steve Jobs Widow wife to participate in Kumbh Mela)
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स या कल्पवासात राहणार आहेत. यावेळी त्या निरंजनी आखाड्यातील महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्या शिबीरात राहणार आहेत. त्यामुळे या काळात त्या विविध विधींमध्ये सहभागी होऊन पवित्र नदीत स्नान करण्याची शक्यता आहे. साधारणतः 29 जानेवारीपर्यंत पॉवेल या सोहळ्यात सहभागी असतील. महत्त्वाची बाब म्हणजे, कल्पवास केल्याने मनाला वेगळीच शांती मिळते. असे मानले जाते की कल्पवास हे मनुष्याच्या आध्यात्मिक विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. संपूर्ण महिना संगमावर राहून पुण्य प्राप्त करण्याच्या या प्रथेला कल्पवास म्हणतात.
हेही वाचा… Mahakumbh Mela 2025 : महाकुंभ मेळ्यात अदानींकडून मोठी मदत; दररोज 1 लाख भाविकांना वाटणार महाप्रसाद
माघ महिन्यात पवित्र नदीत केल्या जाणाऱ्या साधनेला कल्पवास म्हणतात. महाभारतानुसार, नऊ वर्षे काहीही न खाता किंवा न पिता तपश्चर्या करण्याचे फळ माघ महिन्यात कल्पवास केल्याच्या पुण्यइतकेच आहे. शास्त्रांनुसार, कल्पवासाचा सर्वात कमी कालावधी एक रात्र असू शकतो आणि बरेच लोक तीन रात्र, तीन महिने, सहा महिने, 12 वर्षे आणि आयुष्यभर कल्पवास करतात.
कल्पवास करणे सोपे नाही. कल्पवास करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये सत्य बोलणे, हिंसा न करणे , इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे, सर्व प्राण्यांवर दया करणे, ब्रह्मचर्य पाळणे, सर्व व्यसनांचा त्याग करणे, ब्रह्म मुहूर्तावर जागे होणे, पवित्र नदीत स्नान करणे या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश आहे. दिवसातून तीन वेळा पवित्र नदीत स्नान करून पूर्वजांना पिंडदान करणे, दान देणे, जप करणे, नियुक्त क्षेत्राबाहेर न जाणे, कोणाचीही टीका न करणे, संतांची सेवा करणे, दिवसातून फक्त एकदाच जेवणे, जमिनीवर झोपणे, अग्नी सेवन न करणे आणि शेवटी देवतांची पूजा करणे यांचा समावेश आहे.